आजकाल हा पॅटर्नच बनलाय..; फरहान अख्तरने रणवीरला सुनावलं, नेमकं काय घडलं?
फरहान अख्तरने अभिनेता रणवीर सिंहवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. रणवीरने 'डॉन 3' या चित्रपटातून अचानक माघार घेतली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये वाद सुरू आहे. आता फरहान नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..

‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्यानंतर अभिनेता रणवीर आणि फरहान अख्तर यांच्यात वाद निर्माण झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘दिल चाहता है’ या चित्रपटाबद्दल बोलताना फरहानने अप्रत्यक्षपणे रणवीरला टोला लगावला आहे. “चित्रपटातून ऐनवेळी माघार घेणं हा आजकाल हा एक पॅटर्नच बनला आहे”, असं फरहान म्हणाला. या वक्तव्यातून त्याने रणवीरवर निशाणा साधल्याची चर्चा होत आहे. ‘डॉन 3’ या चित्रपटावरून मोठा वाद झाला होता. शूटिंगच्या काही दिवस आधीच रणवीरने या प्रोजेक्टमधून माघार घेतली होती. यामुळे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांना मोठा फटका बसला होता. फरहानने याप्रकरणी रणवीरविरोधात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडे (FWICE) तक्रारसुद्धा केली होती.
रणवीरमुळे फरहानचं नुकसान
फेडरेशनच्या बैठकीनंतर रणवीरविरोधात इंडस्ट्रीत असहकाराचे आदेश जारी करण्यात आले होते. 2023 मध्ये निर्मात्यांकडून ‘डॉन 3’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. यामध्ये रणवीर सिंह डॉनची मुख्य भूमिका साकारणार होता. नंतर काही मतभेदांमुळे रणवीरने या चित्रपटातून शूटिंगच्या काही दिवस आधी अचानक माघार घेतली. यामुळे निर्मात्यांचं 45 कोटी रुपयांचं नुकसान झालं. हा वाद अजूनही मिटला नाही.
फरहानचा उपरोधिक टोला
‘दिल चाहता है’ या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त फरहान अख्तरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला. दिग्दर्शक म्हणून फरहानचा हा पहिलाच चित्रपट होता. कलाकारांच्या तारखांची जुळवाजुळव करताना खूप अडचणी आल्याचा खुलासा त्याने यावेळी केला. दुसऱ्या चित्रपटासोबतच्या शूटिंग शेड्युलमध्ये अडचणी येत असल्याने सैफ अली खान ‘दिल चाहता है’मधून माघार घेण्याचा विचार करत होता. “माझ्यासाठी ती अत्यंत वाईट गोष्ट होती. शूटिंग सुरू होण्यासाठी दहा दिवस नाही तर जवळपास एक महिना बाकी होता आणि आजकाल हे असं सतत घडताना दिसतं”, असा उपरोधिक टोला त्याने लगावला.
फरहानने यावेळी थेट रणवीरचं नाव घेतलं नसलं तरी त्याचा इशारा रणवीरकडेच होता. कारण ‘डॉन 3’च्या शूटिंगच्या काही दिवस आधीच रणवीरने त्यातून माघार घेतली होती. रणवीर सिंहच्या टीमने फरहान अख्तर आणि इतरांसोबत मिळून हे प्रकरण सोडवण्याचा खूप प्रयत्न केला होता. रणवीरकडून एक्स एंटरटेन्मेंटला 35 कोटी रुपयांची एक मोठी ऑफर देण्यात आली होती. मात्र फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी ही ऑफर नाकारली. रणवीरने चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने फरहान आणि रितेश यांच्या निर्मिती संस्थेला मोठं नुकसान सोसावं लागलं.
