
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘नशिबवान’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही गोष्ट आहे गिरीजा नावाच्या मुलीची, जिच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत. आई-वडिलांचं प्रेम नाही, लहान वयातच आलेली घरची जबाबदारी आणि जगण्यासाठीचा संघर्ष असं खडतर आयुष्य गिरीजाच्या नशिबी आलंय. मात्र या कठीण प्रवासात ती नशिबवान आहे याचा उलगडा तिला होतो. गिरीजा नशिबवान का आणि कशी ठरते याची गुंफलेली सुंदर गोष्ट म्हणजे नशिबवान मालिका. या मालिकेतून प्रसिद्ध अभिनेता तब्बल सहा वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन करतोय. या अभिनेत्याने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. आता ‘नशिबवान’ या मालिकेत तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
या अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अजय पूरकर आहे. अजय पूरकर या मालिकेत खलनायक म्हणजेच नागेश्वर घोरपडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. नागेश्वर आपल्या पैशांच्या जोरावर सामान्य माणसांना त्रास देतो. खून करायलाही मागेपुढे बघत नाही. देवीची पूजा करतो. पण राक्षसारखा लोकांचा छळ करतो. इतका क्रूर वागूनही तो कधीच कोणत्या केसमध्ये अडकत नाही.
हे खुनशी पात्र साकारणं किती आव्हानात्मक आहे हे सांगताना अजय पूरकर म्हणाला, “जवळपास 6 वर्षांनंतर मी मालिकेत काम करतोय. मला नागेश्वर हे पात्र ऐकताच क्षणी खूप आवडलं. एकतर स्टार प्रवाहसारखी नंबर वन वाहिनी आणि कोठारे व्हिजन्ससारखी निर्मिती संस्था असताना नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. महेश कोठारेंसोबत काम करण्याचं माझं स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतंय. नागेश्वर या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. या पात्राच्या अनुषंगाने मालिकेची गोष्ट घडणार आहे. याआधी मी इतका प्रभावशाली खलनायक साकारलेला नाही. त्यामुळे नागेश्वर साकारताना अभिनेता म्हणून माझा कस लागणार आहे.”
अजय पूरकरने श्री शिवराज अष्टक फिल्म सीरिजमधील ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’मध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि तानाजी मालुसरे यांच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘प्रेमाची गोष्ट’, ‘अग्ली’, ‘संघर्ष’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडली आहे.