Govinda: कोमलसोबत गोविंदाचं दुसरं लग्न? अखेर मॅनेजरने सोडलं मौन; या निर्णयांचे परिणाम..
Govinda: गोविंदा दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होता, असा धक्कादायक दावा त्याची पत्नी सुनिता अहुजाने केला आहे. यावर आता गोविंदाच्या मॅनेजरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मॅनेजर नेमकं काय बोलला, ते वाचा..

Govinda : गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने घटस्फोटाची याचिका मागे घेतली असली तरी त्यांच्यातील कौटुंबिक वाद आणि मतभेद अद्याप मिटले नसल्याचं दिसतंय. घटस्फोट मागे घेतल्यानंतरही पती-पत्नीमधील वाद मिटण्याऐवजी तो अधिकच चिघळला आहे. राखी सावंतशी फोनवरून बोलताना सुनिताने गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाविषयी धक्कादायक दावा केला होता. ते दोघं लग्न करण्याच्या तयारीत होते, म्हणूनच मी घटस्फोटाची याचिका मागे घेतली, असं सुनिता म्हणाली. सुनिताच्या या वक्तव्यामुळे गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाविषयी विविध चर्चा होऊ लागल्या आहेत. आता गोविंदाच्या मॅनेजरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘इंडिया टुडे’शी बोलताना गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा म्हणाले, “सुनिता यांचं वक्तव्य ऐकून मला धक्काच बसला. असं काहीही नाही आणि होणारही नाही. गोविंदा यांचं दुसरं लग्न झालेलं नाही. सुनिता या गोविंदा यांच्या पत्नी आहेत आणि कदाचित त्यांच्या मनात काहीतरी चाललं असेल ज्यामुळे त्या असं बोलण्यात प्रवृत्त झाल्या असतील. गोविंदा यांच्या दुसऱ्या लग्नाची कधीही चर्चा झालेली नाही. ते सध्या पूर्णपणे त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहेत.”
यावेळी मॅनेजरने असाही प्रश्न उपस्थित केला की, जर गोविंदाला खरोखरच सुनितासोबतचं नातं संपवायचं असतं किंवा दुसरं लग्न करायचं असतं, तर त्याने स्वत:हून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली नसती का? “मात्र तसं घडलं नाही. सुनिताने आधी घटस्फोटाचा खटला दाखल केला आणि नंतर मागे घेण्याचा निर्णयही त्यांचाच होता”, असं मॅनेजरने स्पष्ट केलं. याविषयी ते पुढे म्हणाले, “दोघंही समजूतदार आहेत. गोविंदा यांनी सुनिता यांच्याविरोधात कधीही जाहीरपणे एक शब्दही उच्चारलेला नाही. तर दुसरीकडे सुनिता त्यांच्या नात्याबद्दलची वैयक्तिक माहिती सातत्याने शेअर करत आहेत. मला खात्री आहे की त्या दोघांनाही स्वत:साठी आणि त्यांच्या मुलांसाठी सर्वोत्तम हवं आहे. त्यांनी खटला मागे घेण्याचा निर्णय का घेतला, हे आम्हाला माहीत नाही. पण आशा आहे की त्यांच्यात सर्वकाही सुरळीत होईल.”
गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्यातील या संपूर्ण वादामुळे मुलांवर परिणाम होत असल्याचंही मॅनेजरने म्हटलंय. “कुटुंबातील वाद लवकरात लवकर मिटवून नकारात्मकता संपवणं सर्वोत्तम ठरेल. गोविंदा हे जबाबदार आणि आदरणीय व्यक्ती असून ते असं काहीही करणार नाही, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर किंवा त्यांच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होईल. गोविंदा यांनी सुनिता यांना त्यांच्या निर्णयांचे परिणाम काय होतील, हे नेहमीच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण कधीही जाहीरपणे त्यांच्या विरोधात बोलले नाहीत”, असं मॅनेजरने स्पष्ट केलं.