
अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे सध्या सतत चर्चेत आहे. पत्नी सुनीता अहुजाने त्याच्यावर विवाहबाह्य संबंधापासून ते मुलाचं करिअर घडवण्यासाठी काहीच पावलं उचलली नसल्याची टीका केली. इतकंच नव्हे तर “तू तुझ्या वडिलांसारखा अजिबात बनू नकोस” असा सल्ला सुनीताने तिच्या मुलाला दिला. या सर्व आरोपांवर आता गोविंदाने प्रतिकिया दिली आहे. कुटुंबासाठीच मी राजकारणातून बाहेर पडलो आणि साजिद नाडियादवालाकडे मुलासाठी मदत मागितल्याचा खुलासा त्याने केला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने त्याच्या पत्नीच्या आरोपांवर भाष्य केलं.
“ज्यावेळी, मी राजकारणातून बाहेर पडलो, तेव्हा मी विचार केला की माझ्यासोबत असलेली स्पर्धा, द्वेष, ईर्षा यांचा माझ्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये. विशेषकरून मुलांखातर मी राजकारण सोडून दिलं. मी साजिद नाडियादवालाकडे मुलाची शिफारस केली. त्याने यशसाठी केबिन दिलं. चित्रपट कसे बनवले जातात, काम कसं चालतं हे सगळं त्याला समजावून सांगितलं. घरात आधीपासूनच असं वातावरण होतं की मी इंडस्ट्रीतील नाती जपण्यात अपयशी ठरलोय. मला फार काही विचारलं गेलंच नाही”, असं गोविंदाने स्पष्ट केलं.
याविषयी गोविंदा पुढे म्हणाला, “मुलांसाठी मी काही करू शकेन, यासाठी मी स्वत: देवाकडे प्रार्थना करतो. माझ्याच घरातले लोक असा विचार करू लागले तर मी कुठे जावं? 18 नवीन दिग्दर्शक आणले, 19-20 निर्माते आणले, 12-13 कलाकार आणले आणि जेव्हा देवाने वेळ दिला, तेव्हा मी पूर्ण सेवा प्रदान केली. या विषयावर मी आणखी चर्चा करणार नाही. याने माझाच अनादर होईल. यशबद्दल बोलायचं झाल्यास, टेक्निकली तो माझ्यापेक्षा उत्तम हे. त्यामुळे त्याला योग्य संधी मिळाली, तर तो नक्की मोठा कलाकार बनू शकेल.”
या मुलाखतीत गोविंदाने त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोपांवरही उत्तर दिलं. “मला सांगा, माझ्यावर असे आरोप कधी लागले नव्हते? सुरुवातीला अभिनेत्रींना स्पर्श करतानाही माझा हात थरथर कापायचा. तेव्हासुद्धा लोकांनी आरोप केले होते. त्यामुळे जे आरोप लावले जात आहेत, ते माझ्या बालपणातील प्रेम आहे. प्रेमाच्या बाबतीत मी कधीच बरोबर चाललो नाही. तरुणाईतल्या प्रेमानेही मला सोडलं. आता ज्या प्रकारे माझ्यावर आरोप होत आहेत, तर हे म्हातारपणातील प्रेम आहे. मी चार-चार मिस युनिव्हर्स हिरोइन्ससोबत काम केलंय. त्यांच्याकडे मी कधी बघायचोसुद्धा नाही. कोणतीच अभिनेत्री माझ्यावर आरोप करू शकत नाही की मी तिला त्रास दिला किंवा अपशब्द म्हटले”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
अभिनेत्रीसोबत नाव जोडल्याबद्दल तो पुढे म्हणाला, “जी हिरोइन माझ्या घरी येतेय, माझ्या घरातल्या चित्रपटाने करिअर सुरू होतंय, मी कधीच खोटं बोलणार नाही. मी सर्व कलाकार आणि खासकरून अभिनेत्रींचे आभार मानतो. त्यांच्यामुळे मी वर्षानुवर्षे इंडस्ट्रीवर राज्य करू शकलो. मी कधीच कोणाशी गैरवर्तन करत नाही आणि अशात ती माझं नाव घेत आहे. माझी आई मला म्हणायची की, गोविंद जेव्हा कुटुंबातील चार सदस्यांना तू तुझं जग मानून बसलास, तर एके दिवशी जेव्हा ते तुझी फसवणूक करतील, तेव्हा तू काय करशील? आणि हे जग जे तुझ्यावर प्रेम करतं, ते मूर्ख आहे का? त्यांचे पैसे हे पैसे नाहीत का, त्यांची आब्रू ही आब्रू नाही का? त्यामुळे मी सर्व अभिनेत्रींचा, जे आता आहेत आणि पुढेही बनतील त्यांचं माझ्या घरात स्वागतच ककतो. मी आज याठिकाणी तुमच्यामुळेच आहे.”