
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत मोठ्या कौटुंबिक वादांपैकी एक अखेर बऱ्याच काळानंतर मिटला आहे. अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. हा वाद मिटवण्यासाठी गोविंदा आणि कृष्णाकडून अनेकदा प्रयत्न झाले. परंतु गोविंदाची पत्नी सुनीता काही केल्या ऐकायला किंवा त्यांना माफ करायला तयार नव्हती. परंतु आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीताने कृष्णासोबतचा दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद संपुष्टात आल्याचा खुलासा केला.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली, “कृष्णाची आई माझी सर्वांत आवडती व्यक्ती होती. गोविंदा आणि माझ्या प्रेमसंबंधाबद्दल त्यांनाच सर्वांत आधी कळालं होतं. कारण मी त्यांनाच भेटले होते. त्या खूप चांगल्या होत्या आणि गोविंदाला आजवर जे यश मिळालंय, त्याचं श्रेय मी त्यांना देते. मी माझ्या मुलांवर किती काळ रागावू शकते? प्रत्येकजण आपापल्या जागी आनंदी असतो, मग हा वाद का? मी सर्व मुलांसाठी प्रार्थना करते. तेसुद्धा माझ्या स्वत:च्या मुलांसारखेच आहेत.” सुनीताच्या या वक्तव्यामुळे दोन्ही कुटुंबातील वाद अखेर संपल्याचं म्हटलं जात आहे.
कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद हा कश्मीरा शाहच्या एका ट्विटमुळे सुरू झाला होता. 2016 मध्ये कृष्णा एक शो करत होता, ज्यामध्ये गोविंदाला आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्याने भाच्याच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर कृष्णाची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीराने एक ट्विट केलं होतं. ‘काही लोक पैशांसाठी डान्स करतात’, असं तिने ट्विटद्वारे टोमणा मारला होता. गोविंदाची पत्नी सुनिताला असं वाटलं की कश्मीराने हे ट्विट त्यांच्या कुटुंबीयांसाठी केलंय. यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला. कश्मीरा आणि सुनीता यांच्यात त्यानंतर बरीच बाचाबाची झाली.
एका मुलाखतीत कृष्णा त्याच्या कौटुंबिक वादावर म्हणाला होता, “माझं मामीवर खूप प्रेम आहे. मामीने तिच्या मुलासारखं माझ्यावर प्रेम केलंय आणि तिने माझ्यासाठी खूप काही केलंय. त्यामुळे तिला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला माहितीये की ते हे सर्व रागाच्या भरात बोलतेय. ती माझी मामी आहे, मी तिचं मन जिंकून घेऊन. त्यांच्या मनात काही खोट नाही.”