
पाकिस्तान संघाला रविवारी कोलंबोत प्रेमदासा स्टेडियमवर टीम इंडियासमोर सपशेल लोटांगण घालावं लागलं. इशान किशनने पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केल्यावर पाकिस्तानी गोलंदाजी गडबडून गेली. त्यामुळे विकेट घेण्याचं विसरून ते धावा रोखण्याकडे लक्ष देऊ लागले. इशान किशनच्या उत्कृष्ट खेळीनंतर भारताने रविवारी पाकिस्तानचा 61 धावांनी सहज पराभव केला. ट्वेन्टी-20 विश्वचषकात हा भारताचा पाकिस्तानवरील धावांच्या बाबतीत आजवरचा सर्वांत मोठा विजय ठरला. हा क्रिकेट सामना सुरू होण्यापूर्वी क्रिकेटप्रेमींनी खचाखच भरलेल्या प्रेमदासा स्टेडियमवर प्रसिद्ध रॅपर ‘हनुमानकाइंड’ने दमदार आणि उत्साहपूर्ण सादरीकरण केलं. परंतु त्याचा हा ‘धुरंधर’ परफॉर्मन्स आणखी चर्चेत आला असता, मात्र कदाचित त्याने त्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला, असं म्हटलं जात आहे.
सामना सुरू होण्यापूर्वी रॅपर हनुमानकाइंडने त्याचं हिट गाणं ‘Big Dawgs’ सादर केलं होतं. त्याच्यासोबत डान्सर्सचीही टीम होती. या परफॉर्मन्समुळे स्टेडियममधील क्रिकेटप्रेमींमध्ये आणखी जोश भरला. भारत आणि पाकिस्तानी देशातील चाहते या परफॉर्मन्सचा पुरेपूर आनंद घेताना दिसले. परंतु या परफॉर्मन्समध्ये त्याने ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या शीर्षकगीताचा समावेश केला नव्हता. या गाण्यात त्याने जॅस्मिन सँडल्ससोबत काम केलं होतं. रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटातील या गाण्यावर पाकिस्तानमध्ये बंदी असल्याचं म्हटलं जात आहे. याच कारणामुळे त्याने भारतात तुफान गाजलेलं हे गाणं मॅचच्या आधी गाणं टाळलं होतं. स्टेडियममध्ये दोन्ही देशांचे क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. म्हणून त्याने असा निर्णय घेतला. हनुमानकाइंडला त्याच्या परफॉर्मन्समधून कोणत्याही वादाला फाटे फुटू द्यायचे नव्हते. त्यामुळे त्याने ‘धुरंधर’मधील गाणं टाळलं होतं.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा काही सत्य घटनांवर आधारित आहे. यामध्ये 1999 मधील कंदहार विमान अपहरण, 26/11 मुंबई हल्ला आणि पाकिस्तानच्या ल्यारीमधील गँगवॉर अशा घटनांचे संदर्भ दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये आक्षेप घेण्यात आला होता. 2019 पासून पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांवर औपचारिकदृष्ट्या विरोध आहे. तरीसुद्धा रणवीरचा ‘धुरंधर’ हा चित्रपट तिथे अनधिकृतपणे सर्वाधिक पाहिला गेल्याचे आकडे समोर आले होते.
भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी हनुमानकाइंडने फक्त त्याच्या ‘बिग डॉग्स’ या गाण्यावरच लक्ष केंद्रीत केलं आणि वादग्रस्त गाण्यांपासून स्वत:ला दूर ठेवलं. जगभरातील लाखो प्रेक्षकांसमोर त्याने वादापेक्षा संगीत आणि उत्साहाला प्राधान्य दिलं.