धर्मेंद्रांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान, हेमा मालिनींनी पुरस्कार स्वीकारताच अहाना झाली भावूक

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते स्विकारला. मात्र, यावेळी मुलगी अहाना भावूक झाली.

धर्मेंद्रांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान, हेमा मालिनींनी पुरस्कार स्वीकारताच अहाना झाली भावूक
| Updated on: May 25, 2026 | 7:05 PM

Dharmendra : 25 मे रोजी दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन स्वीकारला. या प्रसंगी संपूर्ण वातावरण अत्यंत भावूक झाले होते. हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांची मुलगी अहाना देखील उपस्थित होती. पुरस्कार स्वीकारताना हेमा मालिनी यांच्या चेहऱ्यावर धर्मेंद्र यांच्या आठवणींची वेदना स्पष्ट दिसत होती तर वडिलांना मिळालेला हा सन्मान पाहून अहाना आपल्या भावना आवरू शकली नाही आणि तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

समारंभादरम्यान अहानाचे पती वैभव वोहरा देखील तिच्यासोबत उपस्थित होते. पत्नी भावूक झाल्यावर त्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. या खास प्रसंगी हेमा मालिनी गुलाबी रंगाच्या साडीत अतिशय साध्या आणि देखण्या अंदाजात दिसत होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी धर्मेंद्र यांच्या वतीने पद्मविभूषण स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना त्या अत्यंत भावनिक झालेल्या दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर पतीला गमावल्याचे दुःख स्पष्ट जाणवत होते.

या सोहळ्यापूर्वी हेमा मालिनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, त्यांची दुसरी मुलगी ईशा देओललाही राष्ट्रपती भवनात उपस्थित राहायचे होते, मात्र काही कारणांमुळे ती येऊ शकली नाही. त्यांनी सांगितले की, हा संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय अभिमानाचा आणि तितकाच भावनिक क्षण आहे. धर्मेंद्र यांना मिळालेल्या या सन्मानामुळे संपूर्ण परिवार आनंदी असून सनी देओल आणि बॉबी देओल यांनाही याची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

300 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम

धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला अमूल्य योगदान दिले. जवळपास सहा दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या दमदार अभिनयासोबतच साधेपणामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवले. ‘शोले’, ‘फूल और पत्थर’, ‘अनपढ़’, ‘हकीकत’, ‘बंदिनी’, ‘सीता और गीता’, ‘मेरा गांव मेरा देश’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमुळे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली.

1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेला ‘इक्कीस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते अभिनय क्षेत्रात सक्रिय होते. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या अभिनयाची जादू आणि आठवणी कायम चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us