क्रूर बळाचा-लाठ्यांचा वापर, ही दृश्ये खूप काळापर्यंत..; अभिनेत्रीचा तीव्र संताप, आंदोलनावर मांडली भूमिका

जंतर मंतर इथल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. ही दृश्ये कायम मनात राहतील, अशा शब्दांत अभिनेत्री हुमा कुरेशनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हुमासह इतर सेलिब्रिटींनी काय म्हटलंय, ते वाचा..

क्रूर बळाचा-लाठ्यांचा वापर, ही दृश्ये खूप काळापर्यंत..; अभिनेत्रीचा तीव्र संताप, आंदोलनावर मांडली भूमिका
हुमा कुरेशी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 21, 2026 | 10:15 AM

दिल्लीतील ‘चलो संसद’ मोर्चासाठी जवळपास 50 हजार आंदोलक जंतर मंतरवर जमले होते. सोमवारी संसद भवन परिसराला अक्षरश: छावणीचं स्वरुप आलं होतं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फेकल्या. सोमवारी दिवसभर या आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विद्यार्थी आणि आंदोलकांवर झालेल्या या लाठीचार्जवर बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर तिने याप्रकरणी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

‘आजची दृश्ये माझ्या मनात खूप काळापर्यंत राहतील. शांततापूर्ण आंदोलकांना अशा क्रूर बळाचा आणि लाठ्यांचा सामना करताना पाहून मला खूप दु:ख झालं. हे नक्कीच अधिक संयमाने, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आणि संवाद साधून हाताळता आलं असतं. आपण, भारताच्या जनतेनं या सरकारला निवडून दिलं आहे आणि आज आपण सर्वांनी प्रश्न विचारले पाहिजेत. आपण एक विशाल आणि वैविध्यपूर्ण राष्ट्र आहोत. प्रत्येक मुद्द्यावर आपल्या सर्वांचं एकमत होईलच असं नाही, पण यावर आपण नक्कीच सहमत होऊ शकतो की बळाचा वापर करण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे. शांततेनं उभं राहिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि नागरिकाला आदर द्या’, अशा शब्दांत हुमा कुरेशीने भावना व्यक्त केल्या आहेत.

हुमा कुरेशीची पोस्ट-

या आंदोलनावर खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. “जर काही समस्या असेल, तर त्यावर योग्य चर्चा झाली पाहिजे. अशा प्रकारे आंदोलन करून काहीही साध्य होणार नाही. देशातील तरुण आणि शिक्षण व्यवस्थेच्या पाठिशी आमचं मोदी सरकार नेहमीच उभं राहिलं आहे. त्यांनी त्यासाठी बरीच कामं केली आहेत. त्यामुळे तुम्ही आता करत असलेल्या आंदोलनाला काहीही अर्थ नाही”, असं हेमा मालिनी म्हणाल्या.

भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत याविषयी म्हणाल्या, “जर तुम्हाला हे इतकं प्रखर वाटत असेल तर तुम्ही स्वत:च निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. कोणाला काढावं आणि कोणाला ठेवावं, हे ठरवण्यासाठी तुम्ही सरकारवर दबाव टाकू शकत नाही. अशा प्रकारचं दबावतंत्र आम्हाला स्वीकार नाही. हळूहळू प्रत्येक जण भाजप आणि सनातन संस्कृतीचा आश्रय घेईल, कारण ही आपली संस्कृती आहे.”

जंतर मंतर इथल्या आंदोलनात प्रकाश राज, शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. तर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Follow Us