देशातील सर्वांत लोकप्रिय सीरिज, 9+ आयएमडीबी रेटिंग; सुरू केलं तर शेवटपर्यंत खाली ठेवणार नाही फोन
जर तुम्ही उत्तम वेब सीरिजच्या शोधात असाल तर देशातील ही सर्वांत लोकप्रिय सीरिज पाहू शकता. पंचायत, मिर्झापूर, पाताल लोक यांसारख्या वेब सीरिजना टक्कर देणारी ही सीरिज आहे, ज्याला आयएमडीबीवर नऊपेक्षा अधिक रेटिंग मिळाली आहे.

विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या विषयांवरील दमदार कंटेंट पहायला मिळतो. ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘मिर्झापूर’, ‘दिल्ली क्राइम’, ‘पाताल लोक’, ‘सेक्रेड गेम्स’ यांसारख्या वेब सीरिजना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. काही वेब सीरिजमध्ये भरपूर ड्रामा पहायला मिळतो, तर काहींमध्ये प्रचंड हाणामारी असते. काहींची कथा इतकी प्रभावशाली असते की, अनेक वर्षांनंतरही ती प्रेक्षकांच्या आवडत्या सीरिजच्या यादीत कायम असते. अशाच एका सीरिजचं नाव आहे ‘द पिचर्स’. या सीरिजमध्ये मित्रांच्या एका अशा ग्रुपची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांच्या स्वप्नांपुढे अडथळेसुद्धा हार मानतात.
गेल्या काही वर्षांपासून स्टार्टअपबद्दल खूप चर्चा होत आहे. ‘द पिचर्स’ची कथासुद्धा अशाच एका स्टार्टअपभोवती फिरते. या वेब सीरिजचे आतापर्यंत दोन सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पहिल्या सिझनमध्ये चार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांनी दुसऱ्या सिझनमध्ये एकत्र मिळून कंपनी सुरू केली आहे. त्यांच्यासोबत आता 24 जणांची टीम काम करते. ‘द पिचर्स’चा दुसरा सिझन या मित्रांच्या कंपनीच्या विस्ताराची आणि त्यादरम्यान येणाऱ्या अडथळ्यांची कहाणी आहे. परंतु ही सीरिज नेटफ्लिक्स किंवा प्राइम व्हिडीओवर नाही तर झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
एकापेक्षा एक दमदार वेब सीरिजची निर्मिती करणाऱ्या टीव्हीएफनेच ‘द पिचर्स’ची निर्मिती केली आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनला आयएमडीबीवर दहापैकी 9 अशी उत्तम रेटिंग मिळाली आहे. तर दुसऱ्या सीरिजला 9.1 रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच आयएमडीबी रेटिंगच्या बाबतीत हे दोन्ही सिझन्स पंचायत, स्पेशल ओप्स आणि मिर्झापूर यांनाही टक्कर देतात. दुसऱ्या सिझनचीही कथा इतकी तगडी आहे की तुम्ही एकदा बघायला सुरुवात केली तर संपूर्ण सिझन बघितल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये कस्तुरिया, अरुणभ कुमार, अभय महाजन, जीतेंद्र कुमार, मानवी गगरू, अभिषेक बॅनर्जी, रिद्धी डोगरा, सिकंदर खेर, गोपाल दत्त आणि विदुशी कौल यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत.
‘द पिचर्स’चा पहिला सिझन 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सीरिजची कथा अशा चार मित्रांभोवती फिरते, जे 9 ते 5 ची नोकरी सोडून काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. त्यासाठी प्रयत्न करून ते स्टार्टअप सुरू करतात. तर दुसऱ्या सिझनची कथा इथूनच पुढे जाते. सात वर्षांनंतर या चार मित्रांच्या आयुष्यात काय बदल झाले, हे यात पहायला मिळतंय. चौघांनी मिळून स्टार्टअप बिझनेस सुरू केला आहे, परंतु मार्केटमध्ये स्पर्धेची काही कमी नाही. या स्पर्धेत ते कसे टिकतात, हे यात दाखवण्यात आलंय.
