40 वर्षांचं नातं संपलं, पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेता म्हणाला, तिची काहीच चूक नाही..
40 वर्षांच्या नात्याचा शेवट, त्यामागची प्रामाणिक कबुली आणि विभक्त झाल्यानंतरही पत्नीशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं यामुळे विनायकनची ही मुलाखत चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतरही पत्नीच आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि ‘जेलर’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे देशभरात लोकप्रिय झालेला विनायकन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तब्बल चार दशकं पत्नी बबितासोबत संसार केल्यानंतर दोघं विभक्त झाल्याचं त्याने सांगितलं आहे. विशेष म्हणजे, या नात्यातील दुराव्यासाठी त्याने पत्नीला जबाबदार न धरता स्वतःच्या वागण्याला कारणीभूत ठरवलं आहे. विनायकनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत मनमोकळेपणाने भाष्य केलं. तो आणि त्याची पत्नी बबिता वयाच्या 19 व्या वर्षापासून एकत्र होते. कॉलेजच्या दिवसांत त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली आणि पुढे दोघांनी लग्न केलं. जवळपास 40 वर्षं दोघांनी एकत्र आयुष्य घालवलं.
का घेतला घटस्फोट?
मात्र आता हे नातं संपलं आहे. विनायकनने स्पष्ट केलं की, दोघांमध्ये मोठं भांडण किंवा एखादा एकच गंभीर वाद झाला म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला नाही. एकत्र राहणं शक्य होत नसल्याने दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, असं त्याने सांगितलं. माझ्या वागण्यामुळे पत्नीला त्रास झाला आणि तिच्या आयुष्यात शांतता राहिली नाही, अशी कबुली विनायकनने दिली. त्याच्या मते, पत्नीला त्याला सांभाळणं कठीण होत होतं. त्यामुळे सततचा गोंधळ आणि तणाव कायम ठेवण्यापेक्षा वेगळं राहणं दोघांसाठी चांगलं असल्याचं त्याला वाटलं. “विभक्त होण्याचं कारण तिची चूक नाही. मी तिला शांतता दिली नाही,” अशी भावना त्याने व्यक्त केली.
विभक्त झाल्यानंतरही पूर्व पत्नीकडून मदत
पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याचंही विनायकनने सांगितलं. त्याच्यासाठी पत्नी ही केवळ जीवनसाथी नव्हती, तर मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करता येणारी व्यक्ती होती. आता अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसल्यामुळे हा काळ अत्यंत कठीण असल्याचं त्याने म्हटलं. 40 वर्षांच्या सहवासानंतर अचानक एकटं राहण्याची सवय लावणंही त्याच्यासाठी सोपं नसल्याचं तो सांगतो. विशेषतः दैनंदिन व्यवहार आणि आर्थिक गोष्टी पत्नीच सांभाळत असल्याने तिच्या अनुपस्थितीची जाणीव आणखी तीव्र झाली आहे.
“मी 19 वर्षांचा असल्यापासून आम्ही एकत्र होतो. आमच्या प्रेमाची सुरुवात महाराजा कॉलेजमध्ये झाली. जवळपास 40 वर्षे एकत्र राहिल्यानंतर.. ती अचानक निघून गेल्यापासून माझ्यासाठी खूप अवघड झालं आहे. विशेषत: पैसे आणि इतर गोष्टी सांभाळणं. माझ्याकडे जी-पे (GPay) सारख्या गोष्टी नाहीत. तीच सर्वकाही सांभाळायची. आजही ती माझ्या अनेक गोष्टींची काळजी घेते. ती माझं युट्यूब चॅनलसुद्धा रिचार्ज करते”, असं विनायकन यांनी सांगितलं.
विनायकनने मार्च 2023 मध्ये सोशल मीडियावर पत्नीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली होती. ‘जेलर’मधील भूमिकेमुळे विनायकनला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र आता त्याच्या या वैयक्तिक आयुष्यावरील वक्तव्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.
