32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश
'कर्ज' या चित्रपटाचे अभिनेते राज किरण हे गेल्या 32 वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या पत्नीने बरीच वर्षे वाट पाहिल्यानंतर दुसरं लग्न केलं, तर मुलीही आता आयुष्यात पुढे निघून गेल्या आहेत. आजही राज किरण यांचा कोणताच पत्ता नाही.

‘कर्ज’ आणि ‘अर्थ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले अभिनेते राज किरण हे सत्तरच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले होते, पण गेल्या तीन दशकांपासून ते बेपत्ता आहेत. राज किरण आता कुठे आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे किंवा ते जिवंत आहेत की नाही, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला ही गोष्ट बराच काळ लपवून ठेवली होती, मात्र नंतर त्यांनी बेपत्ता झाल्याची माहिती उघड केली. अनेक वर्षे त्यांचा शोध घेऊनही काहीच मागमूस लागला नाही, असं कुटुंबीयांनी स्पष्ट केलं. 1994 नंतर राज किरण दिसले नाहीत. ते बेपत्ता होऊन आता 32 वर्षे झाली आहेत.
नैराश्यात होते राज किरण
राज किरण हे नैराश्यात होते आणि मानसिक आजाराने ग्रस्त होते, असं म्हटलं जातं. त्यांच्या मुलीनेही या वृत्ताला दुजोरा दिला होता. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या मुलीने सांगितलं, “माझ्या वडिलांना काही प्रमाणात मानसिक आजार होता. आम्हाला तो कौटुंबिक पातळीवर हाताळायचा होता. आई आणि काकांनी त्यांना शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यांना शोधण्यासाठी आम्ही खासगी गुप्तहेरांनाही नेमलं होतं. पण ते न्यूयॉर्कमधून अचानक गायब झाले होते. ते कुठे जाणार होते याबद्दल त्यांनी घरातील कोणालाही सांगितलं नव्हतं.”
आयुष्यात पुढे गेल्या पत्नी अन् मुली
राज किरण यांना ऋषिका महतानी आणि मन्नत महतानी या दोन मुली आहेत. दोघीही सध्या त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी आहेत. ऋषिका ही ज्वेलरी डिझायरन आणि ब्लॉगर आहे. ऋषिकाचं लग्न ज्वेलरी डिझायनर रवी शाह यांच्याशी झालं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी रवी शाह यांनी डिझाइन केलेले दागिने परिधान केले आहेत. ती अनेकदा वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत असते. ऋषिका नुकतीच एका मुलीची आई झाली आहे.
राज किरण यांची दुसरी मुलगी मन्नत हिचं 2020 मध्ये लग्न झालं. तर पत्नी रुपा महतानी यांनी पुनर्विवाह करण्यापूर्वी राज यांची काही वर्षे प्रतीक्षा केली होती. राज किरण यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी 1975 मध्ये ‘कागझ की नाव’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र ‘कर्ज’ या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासोबत काम केल्यानंतर त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऋषी कपूर आणि राज किरण यांची मैत्री झाली होती. राज किरण यांनी दोन दशकांपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. मात्र 1990 च्या दशकात त्यांना कमी ऑफर्स मिळू लागल्या, तेव्हा ते लोकांच्या नजरेतून गायब झाले. ते शेवटचे 1994 मध्ये दिसले होते.