Gaurav Khanna: घटस्फोटाच्या कागदपत्रांवर फक्त सही बाकी..; शोमधून बाहेर येताच गौरव खन्नाच्या पत्नीचा खुलासा
'लॉक अप 2' या शोमधून बाहेर पडल्यानंतर आकांक्षा चमोला पुन्हा एकदा गौरवसोबतच्या घटस्फोटाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. आता फक्त कागदपत्रांवर सही करणं बाकी असल्याचं तिने सांगितलं.

‘लॉक अप 2’ या शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचलेल्या अभिनेत्री आकांक्षा चमोलाला विजेतेपद मात्र मिळवता आलं नाही. या शोच्या सुरुवातीलाच तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांत मोठा खुलासा केला होता. पती गौरव खन्नाला घटस्फोट देणार असल्याचं तिने सांगितलं होतं. गौरव हा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असल्याने चाहत्यांना सर्वांत मोठा धक्का बसला होता. परंतु आकांक्षाने फक्त टीआरपीसाठी घटस्फोटाचं नाटक केलं होतं, अशीही टीका झाली होती. आता शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने त्यावर स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. फक्त घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करणं बाकी असल्याचं तिने म्हटलंय.
काय म्हणाली आकांक्षा?
माध्यमांशी बोलताना आकांक्षा म्हणाली, “मला नाही वाटत की कोणतीही मुलगी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन फक्त टीआरपीसाठी घटस्फोट घेत असल्याचं सांगेल. ज्यांना असं वाटतं त्यांना मी काहीच सांगू शकत नाही. जर कोणाला काही शंका असेल, तर कृपया त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्या लीगल टीमशी बोलावं. मी लॉकअप 2 मध्ये जाण्यापूर्वीपासूनच आमची लीगल टीम यावर काम करत होती. मी बाहेर आल्यानंतरही आम्ही अजूनही गोष्टी मार्गी लावत आहोत. आता फक्त कागदपत्रांवर सही करणं बाकी आहे. बाकी सर्वकाही आधीपासूनच निश्चित झालं आहे. त्यामुळे हा काही टीआरपीसाठीचा स्टंट नव्हता.”
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
“जेव्हा आमचं लग्न झालं होतं, तेव्हासुद्धा लोक म्हणाले की आम्ही पब्लिसिटीसाठी लग्न करत आहोत. आम्ही कलाकार आहोत, याचा अर्थ असा नाही की आमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट फक्त प्रसिद्धीसाठी आहे”, असं ती पुढे म्हणाली. आकांक्षा आणि गौरव यांनी 24 नोव्हेंबर 2016 रोजी लग्न केलं होतं. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गौरव आणि आकांक्षा ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ‘लॉक अप सिझन 2’मध्ये आकांक्षाने म्हटलं होतं की, गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार आहोत. इतकंच नव्हे तर, आमच्यात विवाहित जोडप्यांसारखी भावनाच राहिली नाही, असंही तिने म्हटलं होतं.
