माधुरी दीक्षितचे प्रचंड वादग्रस्त 3 चित्रपट, झालेली बंदीची मागणी, तरीही ठरले सुपरहिट, शेवटचा तर…
वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या माधुरी दीक्षितच्या या तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; बंदीची मागणी होऊनही ठरले सुपरहिट. शेवटचा तर प्रचंड वादग्रस्त.

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. अनेक सुपरहिट चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. उत्कृष्ट अभिनय, मोहक नृत्य आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे माधुरीने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले.
मात्र, तिच्या कारकिर्दीत काही असे चित्रपटही आले, जे प्रदर्शित होण्यापूर्वी किंवा प्रदर्शित झाल्यानंतर विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले. काही चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, या सर्व वादांनंतरही हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरले.
दयावान : इंटीमेट सीनमुळे रंगला वाद
या यादीत पहिलं नाव आहे 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दयावान’ या चित्रपटाचं. अवघ्या दोन महिन्यांत तयार झालेला हा चित्रपट 21 ऑक्टोबर 1988 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यातील इंटीमेट सीन त्या काळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे हा सीन चित्रीत करताना कोणतेही पार्श्वसंगीत नव्हते. मात्र, नंतर त्याला ‘आज फिर तुम पे प्यार आया है’ हे गाणे जोडण्यात आले.
‘दिल’मधील किसिंग सीनवरूनही गदारोळ
माधुरी दीक्षितचा आणखी एक वादग्रस्त चित्रपट म्हणजे 1990 मध्ये प्रदर्शित झालेला ‘दिल’. या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत होता. कॉलेज रोमान्सवर आधारित या चित्रपटातील आमिर आणि माधुरीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
मात्र, चित्रपटातील आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांच्यातील दोन किसिंग सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. एका मुलाखतीत माधुरीने सांगितले होते की, या सीनमुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
‘खलनायक’वर बंदीची मागणी
या यादीतील तिसरा आणि सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे 1993 मध्ये प्रदर्शित झालेला ‘खलनायक’. या चित्रपटामुळे माधुरी दीक्षितच्या लोकप्रियतेला नवे शिखर मिळाले. चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले, पण त्याचवेळी त्यावरून मोठा वादही निर्माण झाला.
दरम्यान, चित्रपटाचा क्लायमॅक्स पूर्ण झाल्यानंतर संजय दत्तचे नाव 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी जोडले गेले आणि त्याला अटक करण्यात आली. या घटनेनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन झाले आणि ‘खलनायक’वर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.