फडणवीस साहेब, मोदीजी… माझा मुलगा अडकलाय, गेले 4 दिवस… मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटता कुवैत या देशाला देखील बसत आहे. कुवैतमध्ये देखील अनेक भारतीय नागरिक अडकलेले आहेत. मराठी अभिनेत्रीचा मुलगा गेले चार दिवस कुवैतमध्ये अडकलेला असून, अभिनेत्रीने मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना कळकळीची विनंती केली आहे.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनेई ठार झाले आहेत. यामुळे इराणची जनता रस्त्यावर उतरली आहे. अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश संयुक्तपणे इराणवर हल्ले करत असल्याने जगात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे कतार, कुवैत, संयुक्त अरब अमिराती या देशांनी आपली हवाई सीमा बंद केली आहे. अशात कुवैतमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकले आहे. मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा देखील कुवैत येथे अडकला आहे. गेल्या चार दिवसांपासून विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवैतमध्ये असल्याने, त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत, ज्याप्रमाणे दुबईत अडकलेल्या लोकांना सुखरुप भारतात आणलं, त्याच प्रमाणे कुवैतमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी मायदेशी येण्याची व्यवस्था करावी.. अशी कळकळीची विनंती विशाखा सुभेदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
विशाखा सुभेदार म्हणाल्या, ‘नमस्कार मी विशाखा सुभेदार… माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे… माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. पण कुवैतमध्ये ‘लेओव्हर’ (Layover) असल्यामुळे त्याचं फ्लाईट तिकडे उतरवण्यात आलं. पण गेले चार दिवस एअरस्पेस नसल्यामुळे विमानं रद्द केली आहेत आणि गेले चार दिवस माझा मुलगा कुवैतमध्ये अडकला आहे. तेथील परिस्थिती आता गंभीर होत आहे… बातम्यांच्या माध्यमातून तेथील परिस्थिती आपण पाहतोय….’
‘माझा मुलगा स्वतः त्याठिकाणी परिस्थिती अनुभवत आहे. अनेक ड्रोन हल्ले होत आहेत. एअर लाईन्स सर्व्हिसेसने त्याची एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. भारतीय दुतावासाने व्यवस्था केली आहे. पण कुवैतमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्याची व्यवस्था करावी. जसं दुबईतील लोकांना आणलं, आता कुवैतमधील नागरिकांना देखील आणण्याची व्यवस्था करावी… अशी माझी कळकळीची विनंती आहे.’
View this post on Instagram
‘अनेक पोरांच्या आया अनेक कुटुंब त्यांची आपल्या मायदेशी वाट बघत आहेत. तर लवकरात लवकर त्यांना सुद्धा आणण्याची व्यवस्था करावी… आमच्या मुलांची काळजी घ्यावी… एवढीच विनंती सरकारला आणि भारताच्या पंतप्रधानांना करत आहे. लवकरात लवकर त्यांनी यासाठी मार्ग काढावा…’ असं देखील विशाखा सुभेदार म्हणाल्या आहेत. सध्या विशाखा सुभेदार यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
