पँथर ते बसपा… कार्यकर्ताही आणि कवी, गीतकारही…; असे होते हृदयनाथ सिन्नरकर

| Updated on: Aug 26, 2021 | 7:48 AM

कवी, गीतकार हृदयनाथ सिन्नरकर हे काळाबरोबर चालणारे कवी होते. त्यामुळे त्यांनी स्वत:मध्ये सातत्याने बदल केला. जसजसा काळ बदलला तसतशी त्यांची गीते आणि कविताही बदलल्या. (Hridaynath Sinnarkar)

पँथर ते बसपा... कार्यकर्ताही आणि कवी, गीतकारही...; असे होते हृदयनाथ सिन्नरकर
Hridaynath Sinnarkar
Follow us on

मुंबई: कवी, गीतकार हृदयनाथ सिन्नरकर हे काळाबरोबर चालणारे कवी होते. त्यामुळे त्यांनी स्वत:मध्ये सातत्याने बदल केला. जसजसा काळ बदलला तसतशी त्यांची गीते आणि कविताही बदलल्या. त्यामुळेच त्यांची गाणी, कविता ताज्या आणि टवटवीत राहिल्या. शिवाय ते चळवळीत कार्यकर्ते म्हणूनही वावरत होते. पँथर ते बहुजन समाज पार्टी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या लिखाणाला अपसूकच सामाजिक अधिष्ठाण प्राप्त झालं होतं. (dalit panther to bsp… know hridaynath sinnarkar’s journey)

काळानुसार गाणी बदलली

हृदयनाथ सिन्नरकर यांनी पाच टप्प्यात गाणी लिहिली आहेत. आंबेडकरी चळवळीतील स्थित्यंतरे आणि बदलते सामाजिक संदर्भ त्याला कारणीभूत आहेत. बाबासाहेबांच्या धर्मांतरापूर्वीचा समाज आणि कालखंड हा त्यांच्या गीतांचा पहिला कालखंड, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणापासून ते रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेपर्यंतचा दुसरा कालखंड, रिपब्लिकन पक्षातील फुटीनंतरचा तिसरा, पँथरची स्थापना हा चौथा आणि खैरलांजी हत्याकांडानंतर बदलले सामाजिक संदर्भ हा पाचवा कालखंड. या बदलत्या संदर्भानुसारच त्यांची गीते बदलली आहेत.

चाखली आहे आताशी, चवही मी साऱ्यातली,
बाड सांभाळून ठेवा, तुमच्या देव्हाऱ्यातली…
आले आहे कळुनी, आता भेद कसा गाडता,
साक्ष देते आहे, तुमची भाषा ही तोऱ्यातली…

किंवा

इश देश के कोने कोने से, कई बात न टलती होने से,
जातीवाद के झगडो में ये दुखिया कौम कसाई है,
दलित बेचारा बकरा है, और सारा देश कसाई है…

किंवा

बारा महिने तेरा काळी कापल्या जाती माना,
कसे म्हणायचे देश या देशा, हा तर कत्तलखाना…

किंवा

भल्या माणसा रे मनी शंका नको काही,
खरे आहे महाराष्ट्र पुरोगामी नाही…

किंवा

सर्वच पीडितांसाठी भीमाचे बंड होते,
पडला न खंड केव्हा, अगदी अखंड होते

दादांच्या या गाण्यांमध्ये बदलत्या सामाजिक संदर्भाची स्थित्यंतरे दिसतात. तब्बल 60-70 वर्षाच्या इतिहासाचा धांडोळाच त्यांनी आपल्या गीतातून घेतला आहे.

पँथर ते बसपा

आंबेडकरी समाजातील कवी, गीतकार हा नुसता कवीच किंवा गीतकार नसतो. तर तो कार्यकर्ताही असतो. त्याला दादा अपवाद कसे ठरतील? दादा पूर्वी पँथरमध्ये सक्रिय होते. त्यांचा राजा ढाले, रामदास आठवले आणि ज. वि. पवार यांच्याशी दोस्ताना होता. नंतर ते बसपात सक्रिय झाले. मायावतीने जे उत्तर प्रदेशात केलं, तेच महाराष्ट्रात होऊ शकतं, यावर त्यांचा गाढा विश्वास होता. पुण्यात खडकीला ज्या अॅनिमेशन फॅक्ट्रीत बसपाचे संस्थापक कांशीराम कामाला होते. त्या फॅक्ट्रीत जयंतनिमित्त दत्ता जाधवांबरोबर सामना केल्याचंही ते सांगायचे.

‘कत्तलखाना’ प्रसिद्ध

त्यांचा आजच्या तरुणांवर प्रचंड विश्वास होता. ही शिकली सवरलेली मुलं नक्कीच बदल घडवून आणतील असं ते सांगायचे. दत्ता खरात आणि दत्ता जाधव हे त्यांचे आवडते गायक होते. तर कवी विवेक मोरे हे आजचे सर्वात बंडखोर कवी असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. ‘भीम तो मेरी जान है’ आणि ‘भीम भारताचा शिल्पकार’ या त्यांच्या दोन गाण्याच्या कॅसेट बाजारात आलेल्या आहेत. प्रसिद्ध साहित्यिक प्र. श्री. नेरुरकर यांची प्रस्तावना असलेला त्यांचा ‘कत्तलखाना’ हा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. 1982 मध्ये प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री दया पवार यांच्या हस्ते हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता. या कार्यक्रमाला स्वत: महाकवी वामनदादा कर्डकही उपस्थित होते. (साभार: आंबेडकरी कलावंत) (dalit panther to bsp… know hridaynath sinnarkar’s journey)

संबंधित बातम्या:

साहिरचा बंडखोरपणा आणि माडगुळकरांच्या शैलीचा मिलाफ; सिन्नरकर कसे घडले वाचा!

‘जग बदल घालूनी घाव…’ हे लोकप्रिय गाणं अण्णा भाऊ साठेंना कुठे सूचलं?; हृदयनाथ सिन्नरकरांनी सांगितलेला किस्सा वाचा!

‘देवदास’चं गाणं डोक्यात बसलं अन् कवी म्हणून उदय झाला; वाचा हृदयनाथ सिन्नरकरांचा किस्सा

(dalit panther to bsp… know hridaynath sinnarkar’s journey)