प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू; बंद खोलीत आढळला मृतदेह

| Updated on: Jul 15, 2023 | 7:16 AM

मुंबईचा फौजदार, देऊळ बंद, पानीपत आदी सिनेमातील अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते, देखणा आणि रुबाबदार नट, रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे.

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू; बंद खोलीत आढळला मृतदेह
Follow us on

पुणे : मुंबईचा फौजदार, देऊळ बंद, पानीपत आदी सिनेमातील अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते, देखणा आणि रुबाबदार नट, रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षाचे होते. तळेगाव दाभाडे येथील बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाने मराठी सिनेसृष्टी गाजवणारा कलावंत गमावल्याची भावना मराठी सिनेसृष्टीतून व्यक्त होत आहे.

रवींद्र महाजनी यांना गेल्या काही दिवसांपासून दम्याचा त्रास जाणवत होता. मावळमधील वातावरण मानवल्यामुळे ते गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मावळमध्ये राहायला आले होते. तळेगांव एमआयडीसी परिसरातील आंबी गावात असलेल्या एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ते भाड्याने राहत होते. फ्लॅटमध्ये ते एकटेच राहत होते. त्यांच्या फ्लॅटमधून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दुर्गंधी येऊ लागल्याने सोसायटीतील नागरिकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी येऊन फ्लॅट उघडण्याचा प्रयत्न केला. पण आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने अखेर फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलीस आत गेले.

हे सुद्धा वाचा

दोन दिवसांपूर्वीच मृत्यू

फ्लॅटमध्ये गेले असता पोलिसांनना एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची पडताळणी केली असता तो मृतदेह प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा असल्याचं आढळून आलं. महाजनी यांचा मृत्यू 2 ते 3 दिवसांपूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज तळेगांव एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा अभिनेता गश्मिर महाजनी यांना कळविण्यात आली आहे.

देखणा नट

मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. त्यांनी आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाच्या जोरावर एककाळ गाजवला. 1975 ते 1990 या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. त्यांनी केलेले सिनेमेही चांगलेच गाजले. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम आहे. लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ आदी सिनेमे चांगलेच गाजले. तर बेलभंडार आणि अपराध मीच केला ही त्यांची नाटकेही गाजली. त्यांनी सत्तेसाठी काहीही या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पाऊल टाकलं होतं. 2015नंतरही त्यांनी सिनेमात काम करणं सुरूच ठेवलं होतं. सेकंड इनिंगमध्ये त्यांनी काय राव तुम्ही, कॅरी ऑन मराठा, देऊळबंद आणि पानीपत आदी सिनेमातून चरित्र नायकाच्या भूमिका साकारल्या.

खालसामधून बीए

रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावचा. प्रसिद्ध पत्रकार ह. रा. महाजनी हे त्यांचे वडील. ह. रा. महाजनी हे लोकसत्तेचे संपादक होते. मात्र, वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता रवींद्र महाजनी यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. रवींद्र महाजनी यांनी बीएसाठी खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्या महाविद्यालयात रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर अशी मंडळी होती. सगळ्यांनाच अभिनयाची आणि चित्रपटांची अत्यंत आवड. शिक्षण पूर्ण करून चित्रपटात जायचे, असे सगळ्यांनी तेव्हाच ठरवून टाकले होते.