
बनारस.. वाराणसी.. एक अशी जागा, जिथे आयुष्यात एकदा तरी जावं अशी अनेकांची इच्छा असते. काही अध्यात्मिक जागांची शक्तीच एवढी तीव्र असते की तिथे गेल्यावर आपल्यात एक वेगळीच ऊर्जा जागृत होते. तर अनेकांना असे अनुभव येतात, जे ते शब्दांत मांडू शकत नाहीत. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री मृणाल ठाकूरला आला आहे. एका मुलाखतीत ती या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील अत्यंत काळ्या आठवणींचाही खुलासा केला, जेव्हा तिने ट्रेनमधून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला होता.
“मी वाराणसीतल्या त्या मंदिरात जेव्हा 30 ते 40 सेकंदांसाठी बसले. ज्या क्षणी मी माझे डोळे बंद केले, त्या क्षणी माझ्यासमोर सगळ्या गोष्टींचा फ्लॅशबॅक आला. माझ्या वडिलांचा चेहरा, त्या मुलींचा चेहरा, ट्रेनमध्ये जेव्हा मी दरवाज्याजवळ उभी होती, तिथून उडी मारण्याचा विचार करत होती.. असे अनेक क्षण मला डोळ्यांसमोर फ्लॅशबॅकसारखे आले. त्यानंतर जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा त्या शक्तीशाली ऊर्जेनं मला सांगितलं की, बघ मृणाल.. या सर्व गोष्टींमधून तू गेली आहेस आणि त्यातूनही तू बाहेर पडली आहेत. पुढे आयुष्यात कदाचित त्यापेक्षाही कठीण परिस्थितींना सामोरं जाण्याची वेळ आली, तर ही शक्ती तुझ्यासोबत कायम राहील. या सर्व प्रवासाची सुरुवात मी का केली होती, ही गोष्ट मी तेव्हापासून कायम लक्षात ठेवते”, अशा शब्दांत मृणाल व्यक्त झाली.
संघर्षाच्या दिवसांत मृणालच्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार आला होता. आणखी एका मुलाखतीत मृणालने याविषयी सांगितलं होतं. “माझ्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या. जर मी काहीच करू शकले नाही तर 23-24 व्या वयात माझं लग्न होईल आणि त्यानंतर मुलंबाळं.. असं झाल्यास संपूर्ण करिअरच संपून जाईल, असं वाटत होतं. मी बरेच ऑडिशन्स दिले होते. सतत नकार पचवल्यानंतर माझ्यात काहीच खास नाही, असा न्यूनगंड निर्माण झाला होता. त्यावेळी मी ऑडिशन्सला जाताना लोकल ट्रेनने प्रवास करायची. तेव्हा अनेकदा माझ्या मनात ट्रेनमधून उडी मारून जीव देण्याचा विचार यायचा”, असा खुलासा तिने केला होता.
मृणालने पत्रकारितेपासून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मालिकांमध्ये काम केलं आणि मालिकांपासून ते मोठ्या पडद्यापर्यंत.. तिने यशस्वी वाटचाल केली. हिंदीसोबतच तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.