जे स्वत: अडाणी, ते शिक्षणाचं महत्त्व काय समजणार? नसीरुद्दीन शाह यांचा मोदींवर हल्लाबोल

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. जे स्वत: अशिक्षित आहेत, त्यांना शिक्षणाचं महत्त्व काय समजणार, असा टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं समर्थन केलं आहे.

जे स्वत: अडाणी, ते शिक्षणाचं महत्त्व काय समजणार? नसीरुद्दीन शाह यांचा मोदींवर हल्लाबोल
Naseeruddin Shah and Narendra Modi
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 24, 2026 | 9:56 AM

दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जे स्वत: अडाणी आहेत, त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळणार नाही, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मोदींना ‘खोटारडे, बहिरे, मुके आणि आंधळे’ असं म्हणत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांनाही फटकारलं आहे. जे पोलीस दिवसाढवळ्या होणारे बलात्कार आणि हत्या थांबवू शकत नाहीत, ते विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सचा वापर करत आहेत, असं ते म्हणाले.

मोदींवर टीका

‘द प्रिंट’ला दिलेल्या मुलाखतीत मोदींबद्दल नसीरुद्दीन शाह म्हणाले, “ते कधी कशाबद्दल प्रामाणिकपणे बोलले आहेत का? त्यांनी त्यांच्या चुकांची जबाबदारी स्वीकारली आहे का? कदाचित आपण चुकलो असू, हे त्यांनी कधी मान्य केलंय का? ते स्वत:ला दैवी मानतात. या व्यक्तीला प्रश्न विचारायला कोणी नाही का? खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं.. ते पत्रकारांशी कधीच बोलत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते की त्यांना 2002 बद्दल विचारलं जाईल. पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी किंवा पहलगाममध्ये मरण पावलेल्या पर्यटकांसाठी ते कधीच रडले नाहीत. ते आम्हाला पेट्रोल वाचवायचा सांगतात आणि स्वत: 10 एसयूव्हीच्या ताफ्यातून फिरतात. ते आम्हाला परदेशात जाऊ नका असं सांगतात आणि दुसऱ्याच रात्री सहा देशांच्या दौऱ्यावर निघतात.”

विद्यार्थ्यांना पाठिंबा

“ते खरंच ढोंगी आहेत, पण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं मला कठीण वाटतं. ते स्वत: निरक्षर असल्याने त्यांना विद्यार्थी आणि शिक्षणाचं महत्त्व समजत नाही आणि ते परीक्षांबद्दल उपदेश करतात. ज्यांनी स्वत: कधी परीक्षा दिली नसेल, अशी व्यक्ती विद्यार्थ्यांना परीक्षा कशी द्यायची हे शिकवत आहे. मी त्या विद्यार्थ्यांना सलाम करतो. त्यांचा दृढनिश्चय आणि त्यांची तळमळ खरी आहे. हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. यात कोणताही राजकीय फायदा किंवा तशा कोणत्याही गोष्टीचा प्रश्न नाही. त्यांना शालेय अभ्यासक्रमातून मूर्खपणा शिकवला जात आहे. त्यांना पंधराव्या शतकात परत नेलं जात आहे. त्यामुळे जेव्हा ते विज्ञान, भूगर्भशास्त्र, भूगोल किंवा इतिहास यांसारख्या क्षेत्रात नोकरी करु इच्छितील, तेव्हा ते कसे तयार असतील? या मुलांना हे माहीत आहे. त्यांच्यासोबत काय घडतंय हे समजण्याइतकं ते हुशार आहेत. मी त्यांच्यासोबत आहे”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

Follow Us