पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार आक्रमक! पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ बद्दल मोठा निर्णय
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांच्या सहभाग असलेल्या चित्रपटांवर बंदी घातली आहे. फवाद खान आणि वाणी कपूर यांचा 'अबीर गुलाल' हा चित्रपटावर आता बंदी घालण्यात आली आहे. सरकारने सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध होत आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट पसरली आहे. त्यानंतर पाकिस्तानसोबत वाढत्या तणावामुळे आणि अलिकडच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे, इथूनपुढे आता पाकिस्तानी कलाकारांचा कोणताही आशय भारतात प्रसारित किंवा प्रदर्शित होऊ दिला जाणार नसल्याचं सरकारने म्हटलं आहे.
अबीर गुलाल चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही
यात आता पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूरचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ अडचणीत सापडला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, अबीर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शितच होऊ दिला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या राजनैतिक आणि सुरक्षा वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ला घटेनवर फवाद आणि वाणीची प्रतिक्रिया
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल फवादने सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘पहलगाममधील हल्ल्याची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं आहे. या घटनेतील मृतांसोबत आमच्या संवेदना आहेत. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी म्हणून आम्ही प्रार्थना करू” अशी प्रतिक्रिया फवादने त्याच्या सोशल मीडियावर पोस्टद्वारे केली होती.
तर वाणीने देखील हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे, पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे की, ‘पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर हल्ला होताना पाहिल्यापासून मला धक्का बसला आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. मी तुटले आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.”
View this post on Instagram
पाकिस्तानी कलाकारांवर बंदी
‘अबीर गुलाल’ हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये फवाद खान मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचा काही भाग परदेशात चित्रित करण्यात आला आहे आणि तो चित्रपट काही महोत्सवांमध्ये दाखवण्यात येणार होता. 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतरही भारतात पाकिस्तानी कलाकारांवर अनौपचारिक बंदी घालण्यात आली होती. अनेक संघटना आणि चित्रपट संघटनांनी अशा चित्रपटांविरुद्ध आवाज उठवला होता. फवाद खानसारखे पाकिस्तानी स्टार यापूर्वी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसले आहेत, परंतु अलिकडच्या घटनांनंतर वातावरण आणखीनच बदलले आहे.
मनसेचा आधीपासूनच होता अबीर गुलालला विरोध
‘अबीर गुलाल’ हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. पण या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला कास्ट केल्याबद्दल चित्रपट निर्मात्यांवर जोरदार टीका होत आहे. मनसेनं महाराष्ट्रात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुरुवातीलाच विरोध केला होता. हा पक्ष बऱ्याच काळापासून पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास विरोध करत आहे. पक्षाने सिनेमागृह मालकांना इशाराही दिला. पण आता जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यानंतर तर संपूर्ण देशातच आता या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.