सगळंच संपलं.. अवघ्या 14 दिवसांत आईवडिलांना गमावलं, मराठी अभिनेत्याचा काळीज पिळवटून टाकणारा अनुभव
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता आयुष भिडे याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण प्रसंगांविषयी सांगितलं. चौदा दिवसांत त्याने त्याच्या आईवडिलांना गमावलं होतं.

‘प्रेमाची गोष्ट’ फेम आयुष भिडेचा काळीज पिळवटून टाकणारा अनुभव; १४ दिवसांत आई-बाबांना गमावलं, म्हणाला… टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आयुष भिडे ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील लकी या भूमिकेमुळे घराघरात पोहोचला आहे. मात्र पडद्यावर हसतमुख दिसणाऱ्या आयुषच्या आयुष्यात एक असा काळ आला होता, ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अवघ्या 14 दिवसांच्या अंतरात त्याने आई आणि वडील दोघांनाही गमावलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुषने या काळातील आठवणी सांगितल्या आणि त्यावेळी त्याला आलेला मानसिक धक्का पुन्हा एकदा समोर आला. आयुषच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला त्यांची प्रकृती फार गंभीर नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र अचानक त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागली आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली.
वडिलांनंतर आईलाही कोरोनाची लागण
त्याच काळात आयुषच्या आईलाही कोरोनाची लागण झाली होती. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील परिस्थिती अत्यंत कठीण असल्याने उपचारांसाठी आवश्यक गोष्टी मिळवणंही आव्हानात्मक होतं. दुर्दैवाने आयुषच्या वडिलांचंही निधन झालं. मात्र आईची प्रकृती लक्षात घेऊन तिला हे सत्य सांगण्याचं धाडस त्याला होत नव्हतं. आईला मानसिक धक्का बसू नये म्हणून आयुषने वडील दुसऱ्या वॉर्डमध्ये उपचार घेत असल्याचं सांगत परिस्थिती सांभाळली. स्वत:च्या मनात दु:खाचा डोंगर असतानाही आईसमोर त्याला धीर दाखवावा लागत होता.
View this post on Instagram
14 दिवसांत आयुष्य बदलून गेलं
याविषयी आयुषने सांगितलं, “आईला कोरोना झाल्यानंतर मी खूपच घाबरलो होतो. रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन-तीन दिवसांनी मला फोन आला की बाबांची तब्येत गंभीर आहे. तुम्ही एक इंजेक्शन घेऊन या. पण नशीब इतकं वाईट की ते मिळालंच नाही. मी कधीच विचार केला नव्हता की असा काही प्रसंग माझ्या आयुष्यात येईल. बाबांच्या निधनानंतर मी आईसमोर अभिनय करायचो की बाबा आहेत, मला खूप वाईट वाटायचं. बाबा गेल्यानंतर 14 व्या दिवशी त्यांचं डेथ सर्टिफिकेट हातात आलं. तेव्हाच हॉस्पिटलमधून फोन आला की आईला व्हेंटिलेटरवर शिफ्ट करतोय. हॉस्पिटलमधून आलेला फोन उचलण्याची माझ्यात हिंमतच नव्हती. त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं, तेव्हाच मला कळलं की आता सगळं संपलंय. आयुष्यात काहीच राहिलं नाही. त्या चौदा दिवसांत माझं संपूर्ण आयुष्य बदललं होतं.”
आईवडिलांच्या निधनाच्या दु:खातून आयुष हळूहळू सावरला आणि अभिनयाच्या माध्यमातून स्वत:ला त्याने व्यस्त ठेवलं. त्याची पहिली मालिका प्रसारित झाली, मात्र तो पहिला एपिसोड पाहू शकला नाही. कारण ज्या आईवडिलांना त्याला टीव्हीवर पाहून आनंद झाला असता, तेच त्यावेळी त्याच्यासोबत नव्हते.
