पुण्याचं बदललेलं स्वरूप मुंबईपेक्षा भयंकर..; मतदानानंतर सुबोध भावेनं व्यक्त केली चिंता

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने पुण्याच्या बदलत्या स्वरुपाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

पुण्याचं बदललेलं स्वरूप मुंबईपेक्षा भयंकर..; मतदानानंतर सुबोध भावेनं व्यक्त केली चिंता
subodh bhave
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 15, 2026 | 10:49 AM

अभिनेता सुबोध भावेनं पुणे महानगरपालिका निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान हा आपला राष्ट्रीय हक्क आहे. हा हक्क असलेल्या सर्वांनी मतदान करावं, असं आवाहन त्याने यावेळी केलं. मतदान करण्यासाठी सुबोध खास मुंबईहून पुण्याला गेला. मतदान केल्यानंतर त्याने प्रतिक्रिया देताना म्हटलंय, “उंच इमारती निर्माण होणं म्हणजे शहराचा विकास नसतो. शहरे संस्कृत आणि मोकळा श्वास घेणारी राहावीत. घटनेनं आपल्याला मतदान करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे, तो आपण पाळला पाहिजे. आपलं कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे. आपलं कर्तव्य बजावून आपण बाहेर बसतो, हेसुद्धा योग्य नाही. ज्या उमेदवारांना आपण निवडून देतोय, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. उमेदवार काम करतात की नाही हे बघणंसुद्धा नागरिकांचं काम आहे.”

“राजकारण्यांवर नागरिकांचा दबाव नसेल तर लोकांनी तक्रारी करून काही उपयोग नाही. नागरिकांचा दबाव ना पुण्यात आहे ना राज्यात आहे. पुण्याचं बदललेलं स्वरूप मुंबईपेक्षा भयंकर होत चाललं आहे. नगरसेवकांनी घेतलेले प्रत्येक निर्णय योग्य आहेत असं आपण म्हटलं तर आपल्याला मतदान करण्याचा काहीही अधिकार नाही. आपल्याला दिलेली आश्वासनं नगरसेवकांनी पूर्ण करायला हवीत. तीन मजली इमारतीच्या जागी 27 मजली इमारती झाल्या म्हणून विकास होत नाही. नवीन कन्स्ट्रक्शन वाढलं, यामुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. विकास हा शहराचा गळा घोटून करायचा नसतो,” अशा शब्दांत त्याने मत व्यक्त केलं आहे.

याविषयी तो पुढे म्हणाला, “मुलांना खेळायला ग्राऊंड नाहीत. जेष्ठ नागरिकांना फिरायला जागा नाहीत. पेशवे वाघाने सारसबागाच्या नावावर किती दिवस उड्या मारणार, मिळेल त्या जागेत आता फक्त बिल्डिंग उभा केल्या जातात. विकास हा माणसं जगण्यासाठी आणि जागवण्यासाठी असला पाहिजे. मतदानापुरतं नागरिकांनी मर्यादित न राहता नागरिक एकत्र आले आणि दबाव गट बनवला तर काही होऊ शकेल. नागरिक विकासात नसतील तर विकास हा अंगावरच येणार आहे. फुकट द्यायचा असेल तर ग्राउंड द्या बाकी काही देऊ नका. शहरातील प्रत्येक माणसाला चांगलं जीवन जगण्याचा हक्क आहे. नागरिकांचं जीवन सुसह्य करणं हे पहिलं काम आहे. बस फुकट देताय, की मेट्रो फुकट देताय, यापेक्षा श्वास घ्यायला जागा देताय का, हे महत्त्वाचं आहे. मला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी एकही मतदानाचा हक्क बजावायचा सोडला नाही. लोकप्रतिनिधींसोबत आपल्यालाही काम करावं लागेल.”

Follow Us