BMC Elections: ही सुट्टी म्हणून घरात राहू नका..; नाना पाटेकरांचं मतदारांना आवाहन
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्याहून मुंबईला येऊन महानगरपालिकेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना, मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान होत आहे. या 29 महापालिकांमध्ये 15,931 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2869 जागा आहेत. तर एकूण 3 कोटी 48 हजार मतदार आहेत. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. क्रिकेटर सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अभिनेता सुमित राघवन आणि त्याची पत्नी चिन्मयी सुमित, दिव्या दत्ता, हेमा मालिनी, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांनी मतदान केलं आहे. यावेळी त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे मुंबईत मतदान करण्यासाठी पुण्याहून आले होते. तीन तास प्रवास करून त्यांनी मुंबई मतदानाचा हक्क बजावला आहे.
काय म्हणाले नाना पाटेकर?
“माझं मतदान मी मुंबईत करतो. मी हल्ली पुण्यात राहतो, पण सकाळी 6 ला तिथून निघालो. आता इथे पोहोचलो आणि मतदान केलं. मला असं वाटतं की मतदान करणं ही आपल्या अस्तित्त्वाची खूण आहे. ते जाणीवपूर्वक सर्वांनी करायला हवं. तुम्हाला जो कोणी उमेदवार योग्य वाटत असेल, त्याला तुम्ही मत द्या. पण जाणीवपूर्वक तुम्ही घराबाहेर पडा. ही सुट्टी म्हणून घरात राहू नका. कृपया बाहेर पडा आणि मतदान करा”, असं आवाहन त्यांनी सर्वसामान्यांना केलं आहे.
#WATCH | Mumbai: After casting his vote for the BMC elections, Actor Nana Patekar says, “… I understand that the sign of my existence is to vote and for this I travelled 3-4 hours (from Pune) and I am returning immediately. So please do vote.” pic.twitter.com/HL7yHUvcaR
— ANI (@ANI) January 15, 2026
हेमा मालिनी यांच्याकडून आवाहन
“मी मुंबईकारांना विनंती करते की, तुम्ही मतदान केलं पाहिजे. मुंबईत चांगली हवा पाहिजे असेल, खड्डेमुक्त रस्ते पाहिजे असतील, प्रगती पाहिजे असेल, सुरक्षा हवी असेल तर आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे. माझा मत देण्याचा हक्क मी बजावला आहे. मुंबई हे जगातील सर्वोत्तम शहर आहे. त्यात सर्वांनी साथ दिली पाहिजे. मी मुंबईकरांना विनंती करते की त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा”, असं हेमा मालिनी मतदानानंतर म्हणाल्या.
मतदान हा आपला राष्ट्रीय हक्क आहे. मतदानाचा हक्क असलेल्या सर्वांनी मतदान करावं. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी खास मुंबईहून पुण्याला आलो आहे. उंच इमारती निर्माण होणं म्हणजे शहराचा विकास नसतो. शहरे संस्कृत आणि मोकळा श्वास घेणारी राहावीत. घटनेनं मतदान करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे, तो आपण पाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुबोध भावेनं दिली.