Raja Shivaji : वीकेंडला थिएटरमध्ये महाराजांचीच गर्जना; शनिवारी ‘राजा शिवाजी’च्या कमाईत 75 टक्क्यांनी वाढ
'राजा शिवाजी' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. गेल्या नऊ दिवसांत या चित्रपटाने किती कमावले, त्याबद्दल जाणून घ्या.. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या बजेटबद्दल रितेश काय म्हणाला, हेसुद्धा सविस्तर वाचा..

अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यात कमाईच्या बाबातीत या चित्रपटाच्या मराठी व्हर्जनने हिंदीला मागे टाकलं आहे. या चित्रपटाची भारतातील पहिल्या आठवड्याची एकूण कमाई 52.65 कोटी रुपये इतकी झाली. ‘सॅकनिल्क’ या इंडस्ट्री ट्रॅकर वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ‘राजा शिवाजी’च्या कमाईत आणखी वाढ झाली आहे. 3962 शोजमधून या चित्रपटाने 5.60 कोटी रुपये कमावले आहेत. ही आकडेवारी शुक्रवारच्या कमाईपेक्षा 75 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या नऊ दिवसांत ‘राजा शिवाजी’ने भारतात 72.91 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून नेट कलेक्शनचा आकडा 61.45 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
रितेश देशमुखच्या या चित्रपटाने जरी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत अद्याप स्थान मिळवलं नसलं तरी मराठी चित्रपटाच्या हिशोबानो ‘राजा शिवाजी’ने आधीच एक मोठा टप्पा गाठला आहे. सॅकनिल्कच्या मते, हा चित्रपट ओपनिंग वीकेंडमध्ये 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “बजेटबद्दलचे खरे आकडे हे फक्त निर्मात्यांनाच माहीत आहेत. आपण चित्रपटाच्या बजेटवर चर्चा करण्याची अजिबात गरज नाही, कारण त्याचा कशावरही परिणाम होत नाही. बजेट इतकं महत्त्वाचं का आहे?”
“जर मला कोणी विचारलं, तर मी त्यांना उलट विचारतो की, तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी तिकिटाचे किती पैसे देत आहात? जेव्हा ते म्हणतात की 100 रुपये, 250 किंवा 300 रुपये.. तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की, तेच बजेट आहे. आपण याबद्दल बोलणं थांबवलं पाहिज. चित्रपटाची जादू कायम राहू द्या आणि फक्त जाऊन तुम्ही त्याचा अनुभव घ्या. जेव्हा मी अमिताभ बच्चन यांचा शोलेसारखा चित्रपट पहायला जायतो, तेव्हा मी कधीच विचार केला नाही की, या चित्रपटाचं बजेट किती असेल? मला फक्त मोठ्या पडद्यावर मनोरंजनाचा आनंद घ्यायचा होता. चित्रपटांनी किती कमाई केली हे आम्हाला कधीच माहीत नसायचं. दुर्दैवाने आजकाल हाच खेळ चालला आहे”, असं रितेश पुढे म्हणाला.