
चेक बाऊन्स प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर अभिनेता राजपाल यादवने शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने त्याच्या 9 कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. यावेळी त्याचे वकील भास्कर उपाध्यायसुद्धा उपस्थित होते. राजपालने सांगितलं की, ज्या कंपनीकडून त्याने त्याच्या चित्रपटासाठी पैसे घेतले, ते सगळं घरचंच प्रकरण होतं. ज्या करारावर त्याने स्वाक्षरी केली होती, ते पूर्णपणे विश्वासावर आधारित होतं. राजपालने त्याच्या कर्जाबद्दल मीडियाला सांगितलं की, “जेव्हा का करार झाला, तेव्हा भास्करजी या संपूर्ण प्रकरणात कुठेही दिसत नव्हते. मी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. जर मी मागे वळून पाहिलं तर मला प्रत्येक करारात काही ना काही त्रुटी आढळतील. जेव्हा हा करार झाला, तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचेल. ही फक्त अहंकाराची लढाई बनली आहे.”
“त्याला माणसाला मी फक्त 5 कोटी रुपयांसाठी त्याच्या पाया पडावं असं वाटतं. तो पैशांचा भुकेला नाही, तो सन्मानाचा भुकेला आहे. जर हे प्रकरण फक्त पैशांबद्दल असतं, तर मी 2013 पासून पैसे देण्यास तयार झालो असतो. पैसे सर्वांत आधी माझ्याकडे आले. मी दिल्लीतील लक्ष्मीनगर इथल्या त्याच्या ऑफिसमध्ये गेलो आणि कागदपत्रे न वाचता आंधळेपणाने त्यावर सही केली. तिथेच माझी मोठी चूक झाली. हे संपूर्ण प्रकरण फक्त कौटुंबिक बाब असल्यामुळे मी त्यात वकिलाचा समावेश केला नव्हता. मी फक्त समोरच्या व्यक्तीच्या शब्दांवर आणि नात्यावर विश्वास ठेवला होता”, असं तो पुढे म्हणाला.
चित्रपटाच्या नुकसानीबद्दल राजपालने सांगितलं, “मी विचार केला की जी व्यक्ती 1000 ते 1500 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असेल, ती फक्त 5 कोटी रुपयांसाठी कोर्टात का जाईल? यात कोणताही वकील समाविष्ट नव्हता, माझ्या पत्नीला काहीच माहीत नव्हतं. आमच्यात झालेल्या करारानुसार, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते 5 कोटींच्या जागी 8 कोटी रुपये परत घेतील आणि उरलेला नफा माझा असेल. परंतु चित्रपटाने फक्त एक कोटी रुपयेच कमावले होते.”
याप्रकरणी राजपाल पुढे काही म्हणण्याच्या आत त्याच्या वकिलांनी त्याला थांबवलं आणि म्हणाले, “जर तुम्ही म्हणत असाल की त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं चुकीचं होतं का? तर राजपालने ती चूक केली आहे.” राजपाल सध्या 1.5 कोटी रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर तुरुंगातून सुटला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मार्च रोजी होणार आहे.