
अभिनेता राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात कैद होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून मिळालेल्या आर्थिक मदतीनंतर अखेर त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने मदत केलेल्या सेलिब्रिटींचे आभार मानले आहेत. राजपालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित लोकांना धन्यवाद म्हटलंय. त्याचसोबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या तुरुंगातील दिवसांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. इतकंच नव्हे तर राजपालने असंही म्हटलंय की जर या खटल्यात तो दोषी ठरत असेल तर तो पुन्हा तुरुंगात जायला तयार आहे.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राजपालने तुरुंगात कसा वेळ घालवला, याविषयीचा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की तुरुंगात इतर कैद्यांना जे जेवण दिलं जात होतं, तेच त्याला मिळत होतं. आपली बाजू मांडताना राजपाल यादवने स्पष्ट केलं की, जर मी कोणाची फसवणूक केली असेल तर गेल्या दहा वर्षांत मला फिल्म इंडस्ट्रीत कामच मिळालं नसतं. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने चेक बाऊन्सबद्दल त्याने अधिक बोलणं टाळलं. या खटल्याबद्दल मुलाखतींमध्ये त्याच्याकडून जर काही चुकीचं बोललं गेलं, तर त्याला कायदेशीर समस्यांचा सामना करावा लागेल, असं तो म्हणाला.
या मुलाखतीत राजपाल पुढे म्हणाला की, तो जसा दिवस येतोय, तसं जगण्याचा प्रयत्न करतोय आणि एक नवीन सुरुवात करतोय. तुरुंगात त्याने इतर कैद्यांप्रमाणेच सर्व नियमांचं पालन केलं आणि न्यायालयाच्या नियमांचंही पालन करत राहणार असल्याचं त्याने सांगितलं. “जर न्यायालयाला मी चुकीचा वाटलो, तर मला पुन्हा तुरुंगात पाठवा, मी त्याचा आदर करेन. मला एका वर्षात कमीत कमी दहा चित्रपट मिळाले आहेत. तर मी फसवणूक करणारा असतो, तर कोणीही माझ्यासोबत काम का केलं असतं? इंडस्ट्रीला हे सिद्ध करण्याची गरजच नाही की ते माझ्यासोबत आहेत, कारण इंडस्ट्रीने कायम माझं समर्थन केलंय. मला पूर्ण विश्वास आहे की प्रत्येकजण माझ्यासोबत आहे. मला मिळालेल्या मदतीचा मी आदर करतो, परंतु मला सहानुभूती नकोय”, असं राजपाल म्हणाला.