राजपाल यादवला कर्ज देणाऱ्या बिझनेसमनने अखेर सोडलं मौन; म्हणाला “त्याच्या घरी जाऊन रडलो तरी…”
मी बिझनेसमन आहे, मला फक्त माझे पैसे परत हवे आहेत, अशी मागणी माधव यांनी केली. राजपाल तुरुंगात गेल्याने मला काही आनंद झाला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात अखेर जामीन मंजूर झाला. याप्रकरणी विविध मुद्दे समोर येत होते, परंतु ज्यांनी त्याला कर्ज दिला, त्यांची बाजू काही व्यवस्थित समजत नव्हती. अखेर राजपालला 5 कोटी रुपयांचं कर्ज देणाऱ्या माधव गोपाल अग्रवाल यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याच मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 2010 मध्ये राजपालला पैसे दिलो होतो, ज्याची परतफेड करण्यात तो अपयशी ठरला होता. आता कॅमेरासमोर येऊन त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. खासदार मिथिलेश कुमार कठेरिया यांच्या माध्यमातून राजपालशी भेट झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यावेळी राजपालने त्यांना सांगितलं होतं की, त्यांचा चित्रपट जवळपास पूर्ण तयार झाला आहे आणि लगेच फंडिंग मिळाली नाही तर सर्वकाही उद्ध्वस्त होईल.
‘न्यूज पिंच’ला दिलेल्या मुलाखतीत माधव म्हणाले, “मी सुरुवातीला त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. परंतु राजपालची पत्नी राधा यादव मला सतत मेसेज करून विनंती करू लागली. त्यामुळे मी त्याला पैसे दिले. मी स्वत: भावूक होऊन त्याची मदत करण्यास तयार झालो. परंतु आमच्यात जो करार झाला होता, त्यात मी स्पष्ट लिहिलं होतं की चित्रपटाच्या यशाने, सेन्सॉर सर्टिफिकेटने किंवा इतर कोणत्याही समस्येमुळे काहीच फरक पडणार नाही. राजपाल यादवला ती रक्कम वेळेतच परत द्यावी लागेल. त्यासोबत त्याने पर्सनल गॅरंटीसुद्धा दिली होती. हे कर्ज होतं, गुंतवणूक नाही. कारण गुंतवणुकीत पर्सनल गॅरंटी किंवा चेक नसतात.”
राजपालने वेळेत पैसे परत न दिल्याने माधव यांनी त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने फंड नसल्याचं सांगितलं. त्यानंतर तीन सप्लीमेंट्री करार बनवण्यात आले आणि नवीन चेक घेण्यात आले. नंतर जेव्हा चित्रपटाचं संगीत अमिताभ बच्चन यांनी लाँच केलं तेव्हा, माधव यांना समजलं. करारानुसार चित्रपट बनल्यानंतर राजपालला पैसे परत द्यायचे होते. रिलीजपर्यंत पैसे देऊ न शकल्याचं राजपालने स्पष्ट केल्यानंतर माधव यांनी सेटलमेंट केलं आणि चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदी कोर्टाकडून हटवली. परंतु जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तो फ्लॉप झाला.
2013 पर्यंत यावर कोणताच तोडगा न निघाल्याने माधव यांनी कोर्टात दाद मागितली. कोर्टात गेल्यानंतर 10.40 कोटी रुपयांवर सेटलमेंट झाला. राजपाल यादवने त्या रकमेचे चेक जमा केले, परंतु ते सर्व चेक बाऊन्स झाले. यामुळे प्रकरण आणखी चिघळलं. यावेळी माधव भावूक होऊन म्हणाले की, “सुरुवातीला मी राजपालच्या घरी गेलो आणि माझ्या पैशांसाठी अक्षरश: लहान मुलासारखं रडलो. कारण मी स्वत: इतका मोठा नाही. मीच दुसऱ्यांकडून उधार घेऊन ते पैसे राजपालला दिले होते. त्याने मला नवीन तारखा दिल्या, नव्या तारखेनुसार करार बनले. परंतु प्रत्येक वेळी राजपालने दिलेले चेक्स बाऊन्स झाले.”
