‘धुरंधर 2’च्या यशानंतर रणवीर सिंहने RSS च्या प्रमुख व्यक्तीची घेतली भेट; चाहत्यांना आश्चर्याचा धक्का!
अभिनेता रणवीर सिंहने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख व्यक्तीची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचंही कळतंय. त्याची ही भेट गुप्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटू लागलं आहे.

अभिनेता रणवीर सिंह सध्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ या चित्रपटांमुळे यशाच्या शिखरावर आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. तरी काहींनी हे चित्रपट प्रोपगेंडा (प्रचारकी) असल्याची टीका केली. रणवीरने यामध्ये भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटावरून दोन गट पडले असतानाच आता रणवीरने अचानक नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. रणवीरने शुक्रवारी नागपुरातील रेशीमबाग इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली. ‘धुरंधर’ चित्रपटावर प्रचारकीची टीका होत असतानाच रणवीरने रेशीमबागच्या स्मृती मंदिराला दिलेली भेट चर्चेचा विषय ठरला आहे.
स्मृतीमंदिराचं घेतलं दर्शन
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीरने रेशीमबाग इथल्या संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराच्या परिसरात भेट देऊन संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक डॉ. गोळवलकर गुरूजी यांच्या समाधी स्थळाला आदरांजली वाहिली. यावेळी तिथल्या संघाच्या प्रतिनिधींना रणवीरला संघाच्या परिसराची ओळक करून दिली. विशेष म्हणजे स्मृती मंदिराला भेट दिल्यानंतर त्याने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचीही भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास अर्धा तास विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
भेटीबाबत गुप्तता
या भेटीमागे विशेष काही कारण नसून ही सौजन्यपूर्ण भेट असल्याचं संघाच्या सूत्रांकडून सांगितलं जात आहे. तरीसुद्धा रणवीरच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. रणवीरने या भेटीदरम्यान संघाच्या चित्रभारती या संघटनेबाबतदेखील माहिती जाणून घेतली. त्यानंतर तो मुंबईकडे निघाला. त्याची ही भेट गुप्त ठेवण्यात आली होती. याआधी संघाच्या शताब्दीनिमित्त रणवीरने व्हिडीओ पोस्ट करत आरएसएसला शुभेच्छा दिल्या होत्या.
‘धुरंधर’ या चित्रपटावरून दोन गट पडले आहेत. त्यापैकी एक गट या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक करत आहे, तर दुसरा गट त्यावर प्रचारकी असल्याचा आरोप करत आहे. अशातच चित्रपट दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगाने सोशल मीडियावर रणवीरच्या या चित्रपटासाठी खास पोस्ट लिहिली होती. हा चित्रपट जबरदस्त आहे आणि जे लोक त्यावर टीका करत आहेत, ते खरंतर घाबरलेले आहेत, असं त्याने म्हटलंय. आदित्य धर दिग्दर्शिक या चित्रपटाच्या पहिल्या भागाने 1300 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या भागाने आतापर्यंत जगभरात 1600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.