
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजेची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता राकेश बापट कलाविश्वात बऱ्याच वर्षांपासून सक्रिय आहे. तो सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनमध्ये सहभागी झाला आहे. तर याआधी तो हिंदी बिग बॉसमध्येही झळकला होता. राकेश त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आला आहे. त्याने प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रिधी डोग्राशी लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या काही वर्षांतच त्यांच्यात खटके उडू लागले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर त्यांच्यात चांगली मैत्री असली तरी एवढी गोड जोडी विभक्त का झाली, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना आजही पडतो. यामागचं कारण राकेशची बहीण शीतल हिने सांगितलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राकेशची बहीण शीतल म्हणाली, “राकेश आणि रिधी यांच्या मनात एकमेकांविषयी खूप आदर आहे. कुठल्याही नात्यात आदर महत्त्वाचा असतो. पण कधी कधी एकमेकांबद्दलच्या अपेक्षा वाढतात आणि त्या अपेक्षांमुळेच नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एकमेकांशी पटत नसेल तर उगाच नात्यात कटुता निर्माण करण्यात काही अर्थ नाही. नातं एका टप्प्यानंतर विषारी बनता कामा नये. राकेशला हीच गोष्ट आवडत नाही. राकेश कुणाचाच तिरस्कार करू शकत नाही आणि रिधीसुद्धा त्याच स्वभावाची आहे. घटस्फोटानंतरही त्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.”
राकेश आणि रिधी यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. एका मालिकेदरम्यान या दोघांची भेट झाली होती आणि सेटवर ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. परंतु हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. एका मुलाखतीत रिधीने खुलासा केला की, जरी लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला असला तरी, आजही जेव्हा तिच्यासमोर एखादी समस्या असते, तेव्हा ती पूर्व पती राकेशची मदत आवर्जून मागते.