Salman Khan : सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार, 2 दिवसात कशी केली शूटर्सना अटक ? असे अडकले जाळ्यात..

| Updated on: Apr 16, 2024 | 10:51 AM

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी येताच त्याचे हितचिंतक चाहते काळजीत पडले. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. पोलिसांनीही कसून तपास सुरू केला आणि अखेर त्यांना त्यामध्ये मोठे यश मिळाले. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Salman Khan : सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार, 2 दिवसात कशी केली शूटर्सना अटक ? असे अडकले जाळ्यात..
Follow us on

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग झाल्यामुळे एकच खळबळ माजली. रविवारी पहाटे झालेल्या या घटनेनंतर सतत नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. या प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सलमानच्या घराबाहेर गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमने दोन्ही आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्यात. ताज्या अपडेट्सनुसार, त्या दोघांनाही चौकशीसाठी गुजरातमधून मुंबईत आणण्यात येत आहे. थोड्याच वेळात गुन्हे शाखेचे पथक आरोपींना घेऊन मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत.

गोळीबारानंतर सलमानसाठी त्याचे हितचिंतक आणि चाहते सर्वच काळजीत असून, अनेक जण त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. या गोळीबारानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असून त्याच्या घराबाहेरही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सरकारनेही या प्रकरणी कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

कशी झाली अटक ?

रविवारी पहाटे सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर दोघेही आरोपी वसई हायवे अर्थात मुंबई अहमदाबाद हायवेच्या दिशेने पळाले होते. एका रिक्षावाल्याला त्यांनी वसई हायवेचा पत्ता विचारला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपींचा माग काढत होते. तसेच सायबर टीमकडून डंप डेटाही काढण्यात आला. दोन्ही आरोपी भुज येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याची पुष्टी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर भुजच्या स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत माहिती देण्यात आली. कारण स्थानिक पोलिसांना न कळवताच मुंबई पोलिस आरोपींना पकडण्यासाठी गेले असते तर ते आरोपी व्यावसायिक गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर गोळीबार होऊ शकतो, अशी शंका होती. त्यामुळेच पोलिसांनी खबरदारी घेत गुजरातमधील स्थानिक पोलीसांचे पथक सोबत घेतले. तर गुन्हे शाखेच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक पथक भुजला पोहोचले. त्यानंतर विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक करून मुसक्या आवळल्या.

दोन्ही आरोपींना भूज येथून मुंबईला आणणार

स्थानिक गुन्हे शाखा युनिटच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पथकाने भुज येथे दोन्ही आरोपींना पकडले. दोन्ही आरोपींना आज मुंबईत आणण्यात येणार असून तेथे पोलीस त्या दोघांचीही कसून चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. रिपोर्ट्सनुसार, दोन्ही आरोपींना भुजमध्ये माता का मढ येथून अटक करण्यात आली. विकी गुप्ता आणि सागर पाल हे दोघेही बिहारच्या चंपारणमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.

मुंबई गुन्हे शाखेने भुज जिल्ह्यातील पश्चिम कच्छ पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक विशिष्ट माहिती दिली आणि तपासादरम्यान सापडलेला सीसीटीव्ही फोटो शेअर केला. पश्चिम कच्छच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माता का मढ येथून आरोपींना पकडण्यासाठी पूर्ण तयारी केली. सीसीटीव्ही स्कॅन करून आरोपींचा माग काढत असताना गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले तेथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आधीच हजर होते. दोघांनी संयुक्तपणे कारवाई करत आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकी गुप्ता (वय 24) हा बिहारच्या चंपानेरमधील मसिही गावचा रहिवासी आहे. तर दुसरा आरोपी सागर श्रीजोगेंद्र पाल (वय 21) हा देखील त्याच गावचा आहे.

शूटर्स सापडले पण हत्यार नाही, पोलिसांकडून शोध सुरू

दरम्यान याप्रकरणी बॅलिस्टिक रिपोर्टसाठी गोळीबारासाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल मिळणं महत्वाचं आहे. माता का मढ मंदिर परिसरात कसून शोध घेतल्यावर पोलिसांनी दोन्ही आरोपींना तर अटक केली. पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सलमनाच्या घराबाहेर ज्या पिस्तूलातून गोळीबार केला, ती पिस्तुल काही पोलिसांना अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाही. आरोपींच्या झडतीत कोणतेही हत्यार सापडले नाही. चौकशीत आरोपी उघडपणे काही सांगत नाहीत. गोळीबारानंतर फरार होताना आरोपींनी हत्यार कुठेतरी लपवून ठेवल्याचा किंवा फेकून दिल्याचा संशय आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात पिस्तूल शोधणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पोलिसांना जिवंत काडतूसही सापडले असून, बॅलेस्टिक अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.