नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाआधी समंथाने घटस्फोटाबाबत सोडलं मौन; म्हणाली “माझ्याबद्दल अनेक खोट्या..”

अभिनेत्री समंथाने 2021 मध्ये नाग चैतन्यला घटस्फोट दिला. या घटस्फोटानंतर तिच्यावर बरीच टीका झाली होती. समंथाला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाच्या काही दिवस आधी समंथाने त्यावर मौन सोडलं आहे.

नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाआधी समंथाने घटस्फोटाबाबत सोडलं मौन; म्हणाली माझ्याबद्दल अनेक खोट्या..
Sobhita Dhulipala, Naga Chaitanya and Samantha Ruth Prabhu
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 26, 2024 | 9:35 AM

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य हे लग्नाच्या चार वर्षांनंतर विभक्त झाले. 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट जाहीर केला. या घटस्फोटानंतर समंथाला बऱ्याच ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. खोट्या चर्चा, टीका होत असतानाही समंथाने त्या कठीण मौन बाळगणं पसंत केलं. आता नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाच्या काही दिवस आधी समंथाने त्या सगळ्या गोष्टींवर मौन सोडलं आहे. नाग चैतन्य हा अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न करण्यासाठी सज्ज झाला आहे. डिसेंबर महिन्यात हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.

‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत समंथा म्हणाली, “दुर्दैवाने आपण अशा समाजात राहतो, जो मूळ पितृसत्ताक आहे. त्यामुळे जेव्हा कधी काही चुकीचं घडतं, तेव्हा स्त्रियांवर टीका केली जाते. मी असं म्हणत नाही की पुरुषांना जबाबदार ठरवलं जात नाही. पण स्त्रियांना फक्त ऑनलाइनच नाही तर खऱ्या आयुष्यातही बऱ्याच टीकेला सामोरं जावं लागतं. माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, ज्या खऱ्या नव्हत्या. पण तरीही मी स्वत:वर नियंत्रण ठेवून मौन बाळगलं होतं. मला अजूनही आठवतंय की माझ्याबद्दल अत्यंत वाईट गोष्टी बोलल्या जात होत्या, बऱ्याच खोट्या गोष्टी पसरवल्या जात होत्या. त्यावेळी मला असं अनेकदा वाटलं होतं की सर्वांसमोर येऊन सत्य काय आहे ते सांगावं.”

“काही लोकांचा स्वभाव फार चंचल असतो. ते एका मिनिटासाठी तुमच्यावर प्रेम करतील, पण जेव्हा तीन दिवसांनंतर तुम्ही काही निर्णय घेता किंवा तुमच्या आयुष्यात काही वाईट घडतं, तेव्हा ते पुन्हा तुमचा द्वेष करू लागतात. पण तुमच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना सत्य माहित असतं. त्यामुळे त्यांना खरं काय ते माहित आहे हे जाणून तुम्ही त्यात समाधान मानलं पाहिजे. लोकांनी माझ्यावर प्रेम करावं, माझं कौतुक करावं हेच मला आतापर्यंतच्या आयुष्यात वाटत होतं. मी अजूनही काही बोलले नाहीये. त्यामुळे ज्यांना जे वाटतं त्यावर त्यांनी विश्वास ठेवावा. हा त्यांचा निर्णय आहे”, असं समंथा पुढे म्हणाली.

दरम्यान नाग चैतन्य आणि सोभिता हे लग्नाआधी दोन वर्षांपर्यंत एकमेकांना डेट करत होते. डेटिंगदरम्यान दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी दोघांनी कधीच प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. दोघांनी थेट साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना लग्नाविषयीची माहिती दिली.

Follow Us