“घटस्फोटानंतर खान कुटुंब माझ्यासाठी..”; काय म्हणाली सोहैलची पूर्व पत्नी?

सीमा सजदेहने सलमान खानचा छोटा भाऊ सोहैल खानशी 1998 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 24 वर्षांनंतर 2022 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. सीमा सध्या विक्रम अहुजाला डेट करतेय. विशेष म्हणजे सोहैल खानशी पळून जाऊन लग्न करण्याआधी सीमाने विक्रमशी साखरपुडा केला होता.

घटस्फोटानंतर खान कुटुंब माझ्यासाठी..; काय म्हणाली सोहैलची पूर्व पत्नी?
"घटस्फोट झाला तरी मी आयुष्यभर त्या कुटुंबाशी.."; सोहैल खानच्या पूर्व पत्नीचं वक्तव्य चर्चेत
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2024 | 2:59 PM

अभिनेता सोहैल खानला 2022 मध्ये घटस्फोट दिल्यानंतरही सीमा सजदेहची खान कुटुंबीयांशी जवळीक पहायला मिळते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सीमा तिच्या आणि सोहैलच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. खान कुटुंबाशी असलेल्या नात्यामुळेच ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या शोमध्ये सहभागी होता आलं, असं ती म्हणाली. सोहैल आणि सीमाने लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर सोहैलच्या कुटुंबाशी कसं नातं आहे, याविषयीही सीमा व्यक्त झाली.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सीमा म्हणाली, “सर्वांत आधी मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छिते की माझ्या पूर्व पतीच्या कुटुंबीयांशिवाय मला ही संधी मिळालीच नसती. मी जेव्हा पहिला सिझन केला होता, तेव्हा मी विवाहितच होते. माझ्यासाठी ते नेहमीच माझं कुटुंब असेल. माझी दोन्ही मुलं तिथे राहतात. घटस्फोट घेतला म्हणजे मी त्यांच्याशी माझं नातं तोडलं असा अर्थ होत नाही. मी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘द खान फॅमिली’चा टॅग काढून टाकणं महत्त्वाचं नव्हतं, तर माझी वेगळी ओळख निर्माण करणं गरजेचं होतं.”

“मी एकदा माझ्या मुलाला ही गोष्ट सांगत होते. या जगात मी फक्त कोणाची आई, कोणाची पत्नी, कोणाची मुलगी म्हणून राहण्यासाठीच आले का? माझी स्वतंत्र काही ओळख नाही का? मी जेव्हा माझ्या आयुष्याकडे पाठीमागे वळून पाहीन किंवा माझी मुलं त्यांच्या आईकडे पाहतील, तेव्हा त्यांना फक्त पत्नी, आई किंवा एक मुलगी दिसू नये. तर त्या पलीकडे जाऊन माझी ओळख त्यांनी पहावी”, असं सीमा पुढे म्हणाली.

स्वत:ला प्राधान्य देण्याचं ठरवलं तरी माझ्यासाठी माझी मुलं खूप महत्त्वाची आहेत, अशीही भावना सीमाने व्यक्त केली. “माझ्या मुलांना मी नेहमीच प्राधान्य देईन. मी माझ्या आयुष्यात जे काही करत असेन, ते जर त्यांना ठीक वाटत नसेल तर मी ते कधीच करणार नाही. मग हा शो असो किंवा माझ्या आयुष्यात पुढे जाण्याबद्दल असो किंवा कुठलाही मोठा निर्णय असो. त्यांना योग्य वाटत नसेल तर ते मी करणार नाही”, असं तिने पुढे स्पष्ट केलं.

खान कुटुंबाला मिळणाऱ्या धमक्यांविषयी सीमा म्हणाली, “मला त्यांची नेहमीच काळजी वाटते. हे स्वाभाविक आहे. मला फक्त माझ्या मुलांची काळजी नाही, तर त्या सर्वांची काळजी आहे. मी आणि सोहैल जरी आमच्या आयुष्यात पुढे निघून गेलो असलो तरी आम्हाला दोन मुलं आहेत. माझ्या मुलांचं ते कुटुंब आहे आणि ते माझंही आहे. आम्ही सर्वजण एक कुटुंब आहोत. मी आयुष्यभर त्या कुटुंबाशी जोडलेली असेन. त्या घरात मी इतकी वर्षे राहिली होती. खान कुटुंबात असताना, विवाहित असताना एक व्यक्ती म्हणून मी घडत गेले. यासाठी मी फक्त त्यांची कृतज्ञ आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us