मुकेश खन्ना स्पर्शही करू द्यायचे नाही.. ; ‘शक्तीमान’च्या गीताने सांगितला अनुभव

'शक्तीमान' या गाजलेल्या मालिकेत गीता विश्वासची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैष्णवीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. मुकेश खन्ना यांनी कधीच स्पर्श करू दिला नाही, असं तिने सांगितलं.

मुकेश खन्ना स्पर्शही करू द्यायचे नाही.. ; शक्तीमानच्या गीताने सांगितला अनुभव
Mukesh Khanna and Vaishnavi
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 06, 2024 | 11:06 AM

‘शक्तीमान’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचे एपिसोड्स बघण्यासाठी प्रेक्षक आतूर असायचे. त्यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये अभिनेते मुकेश खन्ना यांनी शक्तीमानची तर अभिनेत्री वैष्णवी मॅकडोनाल्डने गीता विश्वासची भूमिका साकारली होती. या दोघांची ऑनस्क्रीन जोडी खूपच लोकप्रिय होती. मुकेश खन्ना त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वैष्णवीने शूटिंगदरम्यान ‘शक्तीमान’चं वागणं कसं होतं, याचा खुलासा केला आहे.

वैष्णवीने सांगितलं, “मुकेशजींसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. मी चित्रपटांमध्ये काम करायची, शक्तीमानच्या आधी मालिकेत काम केलं नव्हतं. मी चित्रपटांच्या सेटवरील माहौल पाहिलं होतं, जिथे महिलांना खूप आक्षेपार्ह वागणूक दिली जायची. त्यांना चांगल्या नजरेनं पाहिलं जात नव्हतं. मी कास्टिंग काऊचसारख्या गोष्टीही सहन केल्या आहेत. मला माझ्या मूल्यांवर जगायला आवडतं. म्हणून मला फार ऑफर्स मिळत नव्हत्या. अखेर मी टीव्हीकडे वळले. जेव्हा मी मुकेशजींसोबत काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी त्यांचं 360 अंश विरोधी व्यक्तीमत्त्व पाहिलं होतं.”

“ते महिलांचा खूप आदर करतात. इतकंच काय तर ते शूटिंगदरम्यान कोणत्याच महिलेला मिठी मारत नाहीत. असे सीन्स स्क्रिप्टमध्ये असले तर ते रद्द करायला लावायचे. मिठी नाही, काहीच नाही. माझ्यासोबत दोन वर्षांपर्यंत काम केल्यानंतर जेव्हा ते कम्फर्टेबल झाले, तेव्हा त्यांना समजलं की मी कशी आहे? तेव्हा कुठे ते माझ्यासोबत कम्फर्टेबल झाले होते. तेसुद्धा इतकंच की मी फक्त त्यांचा हात पकडू शकत होते. मला त्यांच्या स्वभावाची ही गोष्ट खूप आवडली होती. मला चित्रपटांमध्ये काम करताना जो आदर मिळाला नाही, तो त्यांच्याकडून मिळाला. आता ते बिनधास्तपणे आपली मतं मांडतात, पण शक्तीमान मालिकेच्या वेळी ते काहीच बोलायचे नाही. महिलांपासून ते दहा पावलं दूरच राहायचे. त्यांनी कधीच कोणाचा अनादर केला नाही”, असं वैष्णवी यांनी पुढे सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us