आशा भोसले यांच्या निधनावर सोनू निगमचं धक्कादायक वक्तव्य, ‘उलट त्यांचं आयुष्य..’

दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या निधनावर प्रसिद्ध गायक सोनू निगमने धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. आशा भोसले यांचं 12 एप्रिल रोजी मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे निधन झालं होतं. त्या 92 वर्षांच्या होत्या.

आशा भोसले यांच्या निधनावर सोनू निगमचं धक्कादायक वक्तव्य, उलट त्यांचं आयुष्य..
Sonu Nigam and Asha Bhosle
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 22, 2026 | 1:25 PM

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं 12 एप्रिल रोजी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. अनेकांनी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून दु:ख व्यक्त केलं. अशातच प्रसिद्ध गायक सोनू निगमने यावर त्याचा वेगळा दृष्टीकोन मांडला आहे. आशा भोसले यांच्या निधनाकडे फक्त दु:खाच्या दृष्टीकोनातून न पाहता त्यांनी जगलेल्या यशस्वी जीवनाचा एक उत्सव म्हणून पाहिलं पाहिजे, असं तो म्हणाला. आशाजींच्या जाण्याने सर्वांनाच दु:ख झालं असलं तरी अशा परिस्थितीत तीव्र शोक व्यक्त करणं योग्य नसल्याचं त्याने म्हटलंय.

“त्या अगदी शेवटपर्यंत सक्रियपणे काम करत राहिल्या. ही अत्यंत दुर्मिळ आणि प्रशंसनीय कामगिरी आहे. त्यांनी आपल्या कामगिरीने इतर कलाकारांसमोर मापदंड निर्माण केला आहे, ज्याचं सर्व कलाकारांनी अनुकरण केलं पाहिजे. लोकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या प्रवासाकडे अत्यंत आदराची, सन्मानाची गोष्ट म्हणून पाहिली पाहिजे. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की त्याने दीर्घकाळ, समाधानकारक काम करावं. आशा भोसले यांनी अखेरपर्यंत काम केलं होतं. अर्थात त्यांचं निधन म्हणजे एका युगाचा अंत आहे. त्यांनी भारतीय चित्रपट संगीताला एक नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनाने संगीत इतिहासातील महत्त्वपूर्ण पर्वाचा अंत झाला”, अशा शब्दांत सोनू निगम व्यक्त झाला.

मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे आशा भोसले यांचं निधन झालं. 13 एप्रिल रोजी मुंबईत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर भोसले कुटुंबीयांनी वाराणसीला जाऊन गंगा नदीत त्यांच्या अस्थींचं विसर्जन केलं. यावेळी संपूर्ण कुटुंब भावूक झालं होतं. आशा भोसले यांचं नात जनाईशी खूप जवळचं नातं होतं. आजीच्या निधनानंतर जनाई पूर्णपणे खचली आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

‘मला हे आवर्जून सांगावंसं वाटतंय की, माझ्या आजीचा आदर करणारे असंख्य लोक आहेत. तिच्या अंत्यविधीला येऊन त्यांनी तिला तो सन्मान दिला आणि तिच्यावरील आपलं प्रेम व्यक्त केलं. मी सर्वांचे मनापासून आभार मानते. माझी आजी या आदरास आणि प्रेमास पात्र होती. मला वाटतं की आपल्या सर्वांच्या हृदयात कायम जिवंत राहील आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, तिने हे सर्व पाहिलं असेल’, अशा शब्दांत जनाईने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Follow Us