अभिजीत दीपकेंच्या CJP आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सेलिब्रिटींना सुरेश ओबेरॉय यांनी सुनावलं, आधी सत्य समजून घ्या..

Suresh Oberoi: ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सीजेपी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींना सुनावलं आहे. एखाद्या गोष्टीची आधी नीट माहिती घ्यावी मगच बोलावं, असं ते म्हणाले.

अभिजीत दीपकेंच्या CJP आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सेलिब्रिटींना सुरेश ओबेरॉय यांनी सुनावलं, आधी सत्य समजून घ्या..
Suresh Oberoi
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 20, 2026 | 3:51 PM

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत अभिजीत दीपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली तरुणांनी मोठं आंदोलन केलं होतं. जंतर-मंतरवरील या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सीजेपी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. शबाना आझमी, प्रकाश राज यांच्यासह सोनाक्षी सिन्हा, सोनू सूद, वीर दास, दिया मिर्झा, सोहा अली खान आणि अन्य कलाकारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी सेलिब्रिटींच्या जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

निधी वासंदानीला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत ते म्हणाले, “आपण जबाबदार व्यक्ती आहोत. जग तुमचं ऐकतं आणि तुम्ही जे सांगता त्याचं पालन करतं. त्यामुळे सेलिब्रिटींनी बोलण्यापूर्वी त्याविषयी संशोधन केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की यामागे कोण आहे, यात कोण कोण सामील आहे? ते सर्व नीटचे विद्यार्थी आहेत की त्यात राजकारणी, दगडफेक करणारे किंवा गोंधळ घालणारे लोक आहेत? जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याबद्दल इतकं कसं बोलू शकता? जर मला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसेल, तर मी त्याबद्दल बोलणार नाही. मी म्हणेन, मला याबद्दल माहिती नाही.”

सुरेश ओबेरॉय यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निधी आणि परदेशी सहभागाबद्दलही काही दावे ऐकल्याचं सांगितलं. “मी कधीही कोणत्याही आंदोलनात जाणार नाही. कारण माझं काम अभिनय करणं आहे, त्यामुळे मी अभिनयच करेन. कार्यकर्ता बनण्यात काय अर्थ आहे? कोणतीही मागणी करण्याचा एक मार्ग असतो. हा कसला मार्ग आहे? मला हे आवडत नाही. रातोरात तुम्हाला स्टार बनायचं असतं, म्हणून तुम्ही दगडफेक करता आणि स्टार बनता. तुम्ही पोलिसांना मारहाण करत आहात”, असं ते पुढे म्हणाले.

जून महिन्यात कॉक्रोच जनता पार्टीने नीट-यूजी पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक या आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यांनी दिल्लीच्या जंतरमंतर इथं उपोषण केलं होतं. शबाना आझमी आणि प्रकाश राज यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. तर सोनाक्षी सिन्हा, सोनू सूद, वीर दास, दिया मिर्झा, सोहा अली खान, अदिती राव हैदरी, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख यांनी जाहीरपणे आपला पाठिंबा व्यक्त केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us