Taarak Mehta : ‘तारक मेहता..’मध्ये मोठा बदल, नव्या अभिनेत्यामुळे जेठालालचं मोठं नुकसान?
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत येत्या काही दिवसांत मोठा बदल होणार आहे. यामुळे जेठालालची भूमिका साकारणारे आणि मालिकेत सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते दिलीप जोशी यांचं मोठं नुकसान होणार आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र जेठालालची भूमिका विशेष प्रसिद्ध आहे. अभिनेते दिलीप जोशी गेल्या अनेक वर्षांपासून मालिकेत ही भूमिका साकारत आहेत. विनोदाची अचूक टायमिंग, त्यांचे हावभाव, डायलॉग बोलण्याची पद्धत.. याबाबतीत ते मोठमोठ्या कलाकारांनाही मागे टाकतात. म्हणूनच ‘जेठालाल’ म्हणून त्यांना फक्त भारतातच नाही तर परदेशातही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मात्र आता जेठालालच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काळात निर्माते मालिकेतील जेठालालचा ट्रॅक कमी करण्याचा विचार करत आहेत.
‘तारक मेहता..’ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच एक नवीन कुटुंब आलं आहे. हे राजस्थानी कुटुंब असून त्यात चार सदस्य आहेत. पती, पत्नी आणि दोन मुलं. अभिनेते कुलदिप गौर या मालिकेत रतन सिंह बिंजोलाची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेत्री धरती भट्ट ही रतनची पत्नी रुपाच्या भूमिकेत आहे. या दोघांना वीर हा मुलगा आणि बंसरी ही मुलगी आहे. आता निर्माते या कुटुंबाच्या कथेवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं कळतंय.
मालिकेत नव्या अभिनेत्याची एण्ट्री-
जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे महिन्यातून पंधरा दिवस शूटिंग करतात आणि सर्वाधिक मानधनसुद्धा घेतात. त्यामुळे निर्माते रतन सिंह बिंजोलाच्या कुटुंबावर जास्त फोकत ठेवून कथा दाखवण्याचा प्लॅन करत आहेत. जेव्हापासून मालिकेत हे नवीन कुटुंब आलं आहे, तेव्हापासून निर्माते सर्वाधिक कथा त्यांचीच दाखवत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून मालिकेत जेठालालचा ट्रॅक दाखवण्यातच आला नाहीये. आधी काही दिवस बाघा आणि बावरीच्या प्रेमकथेवरचा ट्रॅक पहायला मिळत होता. तेव्हासुद्धा जेठालाल मालिकेत कमीच दिसले.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15-16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जेठालाल हे या मालिकेतील सर्वांत लोकप्रिय पात्र आहे. या पात्राबद्दल काही विशेष निर्णय घेण्यात आला का, याविषयी अद्याप निर्मात्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तर अभिनेते दिलीप जोशीसुद्धा याबद्दल व्यक्त झाले नाहीत. त्यामुळे येत्या काळात या मालिकेत नेमके कोणते बदल होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.