थलपती विजय यांनी मुख्यमंत्री बनताच 48 तासांत त्रिशासाठी घेतला मोठा निर्णय; थेट बदलला हा नियम

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी मुख्यमंत्री होताच 48 तासांत अभिनेत्री आणि जवळची मैत्रीण त्रिशा कृष्णनसाठी खास निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ज्या गोष्टीसाठी गेल्या तीन वर्षांपासून तमिळनाडूमध्ये बंदी होती, त्याबाबत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

थलपती विजय यांनी मुख्यमंत्री बनताच 48 तासांत त्रिशासाठी घेतला मोठा निर्णय; थेट बदलला हा नियम
Thalapathy Vijay and Trisha Krishnan
Image Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2026 | 3:59 PM

तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी बुधवारी सभागृहात आपलं बहुमत सिद्ध केलं, ज्यामध्ये 144 आमदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केलं. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आणि शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर थलपती विजय यांनी वेगाने कामाला सुरुवात केली आहे. एकीकडे मंगळवारी त्यांनी राज्यातील 717 दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे विजय यांनी त्यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णनला एक विशेष परवानगी दिली आहे. त्यांनी हा निर्णय तमिळ चित्रपटसृष्टीच्या हितासाठी घेतला असला तरी त्याचा थेट फायदा त्रिशाच्या आगामी ‘करुप्पू’ या चित्रपटाला होणार आहे. विजय यांनी दिग्दर्शक आर. जे. बालाजी यांच्या ‘करुप्पू’ या चित्रपटाच्या सकाळी 9 वाजताच्या शोसाठी विशेष परवानगी दिली आहे. तमिळनाडूमध्ये यापूर्वी सकाळच्या शोजना बंदी होती.

त्रिशा कृष्णन आणि सूर्या यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘करुप्पू’ हा चित्रपट येत्या गुरुवारी 14 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे निर्माते एस. आर. प्रभू आणि एस. आर. प्रकाशबाबू यांच्या ‘ड्रीम वॉरियर पिक्चर्स’ या निर्मिती संस्थेनं विजय यांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी विजय यांचे आभार मानले. ‘आमचे माननीय मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी ‘करुप्पू’च्या सकाळी 9 वाजताच्या शोसाठी विशेष परवागनी दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. करुप्पूचा फर्स्ट डे फर्स्ट शो 14 मे पासून सकाळी 9 वाजता सुरू होईल.’

देशातल्या इतर राज्यांमध्ये सकाळी 9 वाजताचे शो सर्वसामान्य असले तरी तमिळनाडूतील थिएटर मालक मात्र सकाळचे शोज लावणं टाळतात. यामागचं कारण म्हणजे तिथल्या सुपरस्टार्सची असलेली प्रचंड फॅन फॉलोईंग. कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंतेपोटी हा निर्णय घेण्यात आला होता. 2023 मध्ये पोंगलच्या वेळी घडलेल्या एका दु:खद घटनेनंतर तमिळनाडू राज्य प्रशासनाने पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या शोजवर कारवाई करण्यास सुरुवात केली. अजितचा ‘थुनाइवू’ आणि विजयचा ‘वारिसू’ या दोन मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळी चाहत्यांनी प्रचंड गोंधळ घातला होता. या गोंधळामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर तमिळनाडूच्या डीएमके सरकारने सकाळच्या शोजवर बंदी घातली होती.

नियमांनुसार सकाळी 9 वाजल्यानंतरच चित्रपटाचे शोज लावले जात होते. मोठ्या चित्रपटांसाठी फक्त चार शोज लावता येतात. तर वीकेंडला पाच शोजसाठी परवानगी आहे. तमिळनाडू सरकारने काही प्रकरणांमध्ये यात सूट दिली आहे. 2024 मध्ये सूर्याच्या ‘कंगुवा’ या चित्रपटाला आणि विजय-त्रिशा यांच्या ‘लिओ’ या चित्रपटाला लवकर शो सुरू करण्याची विशेष परवानगी देण्यात आली होती. मात्र लिओच्या बाबतीत प्रदर्शनाच्या काही दिवसांतच ही विशेष परवानगी रद्द करण्यात आली होती. यामुळे निर्मात्यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तरीही सरकारने कोणतीही सवलत दिली नव्हती.

अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत असलेल्या नातेसंबंधाच्या चर्चाच्या पार्श्वभूमीवर विजय यांचा हा निर्णय अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. गेल्या काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या अफेअरच्या चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर विजय यांची पत्नी संगीता सोरनालिंगमने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली. या याचिकेच संगीताने विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. त्रिशाने विजय यांच्या राजकीय प्रवासाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. निवडणुकीतील विजयानंतर ती त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती. त्यानंतर शपथविधी सोहळ्यातही त्रिशाने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

Follow Us