Bigg Boss Marathi Season 3 Elimination | ‘ताईगिरी’ संपली, तृप्ती देसाई ‘बिग बॉस मराठी 3’मधून बाहेर, मांजरेकरही हळहळले

| Updated on: Nov 08, 2021 | 8:13 AM

अखेर महेश मांजरेकर यांनी तृप्ती देसाई यांचे एलिमिनेशन झाल्याचं सांगितलं. ही घोषणा होताच सर्वच स्पर्धकांच्या अश्रूंचा बांध फुटला. गायत्री दातार हमसाहमशी रडत होती. तर मीरालाही अश्रू अनावर झाले होते

Bigg Boss Marathi Season 3 Elimination | ताईगिरी संपली, तृप्ती देसाई बिग बॉस मराठी 3मधून बाहेर, मांजरेकरही हळहळले
Trupti Desai
Follow us on

मुंबई : ‘बिग बॉस मराठी 3’मधून (Bigg Boss Marathi Season 3) सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांची एक्झिट झाली आहे. राज्यभरात ‘ताईगिरी’ने धुमाकूळ घालणाऱ्या तृप्ती देसाईंचा वेगळा पैलू ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळाला होता. मात्र 49 दिवसांच्या प्रवासानंतर तृप्ती देसाईंना निरोप द्यावा लागला. तृप्तीताईंना टाटा-बाय बाय करताना इतर स्पर्धकांना अश्रू अनावर झालेच, मात्र खुद्द सूत्रसंचालक महेश मांजरेकरही हळहळले.

‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये विशाल निकम, तृप्ती देसाई, जय दुधाणे, सोनाली पाटील आणि मीनल शाह हे पाच स्पर्धक घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. शनिवारी यापैकी विशाल आणि मीनल सेफ असल्याची घोषणा महेश मांजरेकर यांनी केली.

स्पर्धकांच्या अश्रूंचा बांध फुटला

दुसऱ्या दिवशी सोनाली पाटील आधी सेफ झाली. जय दुधाणे आणि तृप्ती देसाई या दोघांपैकी कोण बाहेर जाणार? याची उत्कंठा सर्वांना लागली होती. अखेर महेश मांजरेकर यांनी तृप्ती देसाई यांचे एलिमिनेशन झाल्याचं सांगितलं. ही घोषणा होताच सर्वच स्पर्धकांच्या अश्रूंचा बांध फुटला. गायत्री दातार हमसाहमशी रडत होती. तर मीरालाही अश्रू अनावर झाले होते. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत तृप्ती देसाई घराबाहेर निघत होत्या, तरी गायत्री त्यांना बिलगून ओक्साबोक्शी रडतच होती. त्यामुळे तृप्तीताईंचाही पाय निघत नव्हता. यावेळी दादूस (संतोष चौधरी)ही काहीसे भावनावश झाल्याचं दिसलं. तर स्नेहानेही आपल्यात कुठलेच वैयक्तिक वाद नसल्याचं सांगत माफी मागितली. तर उत्कर्ष शिंदेनेही त्यांना नॉमिनेट केल्याबद्दल क्षमा मागितली.

तृप्ती देसाई या बिग बॉसच्या घरातील स्ट्राँग स्पर्धक मानल्या जात होत्या. तृप्ती ताईंच्या एलिमिनेशननंतर खुद्द महेश मांजरेकर यांनीही त्याची कबुली दिली. याआधी, दिवाळीनिमित्त स्पर्धकांना घरातून भेटवस्तू आल्या होत्या. तृप्ती देसाई यांना धाकट्या भावाने पत्र लिहिलं होतं. तर बांगड्या भेट म्हणून पाठवल्या होत्या. पत्रामध्ये वडील तुझी आठवण काढतात, साडेनऊ वाजले की म्हणतात, ‘दादा टीव्ही लाव आपली दीदी टीव्हीवर आली असेल’ असं बाबा म्हणत असल्याचंही त्यांच्या भावाने पत्रात लिहिलं होतं. हे वाचताना तृप्ती देसाईंना हुंदका आला. मी या घरात कधी रडले नाही, पण आज डोळ्यात पाणी आलं, असं त्या म्हणाल्या.

‘महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला…’

काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई आणि सोनाली पाटील यांच्यात किचनमध्ये भांड्याला भांडं लागलं होतं. ‘माझ्याशी असं बोलायचं नाही, नीट बोलायचं’, असं चढ्या आवाजात तृप्ती देसाई म्हणाल्या होत्या. यावेळी सोनालीने ‘महिला’ हा मुद्दा उचलून धरत, या महिलांच्या हक्कांसाठी भांडतात आणि इथे महिलांवरच कुरघोडी करतात, महिला, महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला…’ असा खोचक टोला तृप्ती देसाई यांना लगावला होता.

महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या तृप्ती देसाई यांची दुसरी बाजू बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाली होती. शनि मंदिरातील चौथऱ्यावरील प्रवेश असो, किंवा शबरीमाला मंदिर, महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी तृप्ती देसाई हिरीरीने पुढे होत्या. बिग बॉसच्या घरात त्यांनी आपली परखड मतं मांडत ताईगिरीही केली, तसं योग्य वेळी सर्वांची आपुलकीने काळजी घेत आईही झाल्या. सर्वांना खाऊपिऊ घालणाऱ्या अन्नपूर्णा असंही त्यांना म्हटलं गेलं.

संबंधित बातम्या :

‘महिला, महिला आणि भांडायला पहिला…’, सोनालीची तृप्ती देसाईंसोबत तूतू-मैमै!

‘धमक्या देऊ नका, असे अनेक आले आणि गेले…’, तृप्ती देसाई आणि विकासमध्ये होणार शब्दांचे वार!