33 वर्षांपूर्वीची मालिका, हिट होताच प्रत्येक कलाकाराला दिलेली मारूती कार, मालिकेत होते 73 कलाकार

33 वर्षांपूर्वी मालिकी, ज्याचे 52 भाग पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कलाकाराला मारूती कार भेट देण्यात आली होती. या मालिकेत होते तब्बल 73 कलाकार. कोणती आहे ती मालिका?

33 वर्षांपूर्वीची मालिका, हिट होताच प्रत्येक कलाकाराला दिलेली मारूती कार, मालिकेत होते 73 कलाकार
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 23, 2026 | 6:28 PM

दूरदर्शनच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मालिकांमध्ये ‘देख भाई देख’ या मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. 1993 मध्ये सुरू झालेली ही मालिका 1994 पर्यंत प्रसारित झाली आणि दीवान कुटुंबातील तीन पिढ्यांच्या गमती-जमतींनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेला IMDb वर 8.6 असे रेटिंग मिळाले आहे.

‘देख भाई देख’चे दिग्दर्शन आनंद महेंद्रू यांनी केले होते. त्यांनी अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत मालिकेची निर्मितीही केली. विशेष म्हणजे ही मालिका दूरदर्शनसाठी सुरुवातीपासून तयार करण्यात आलेली नव्हती; मात्र डीडी मेट्रोवर प्रसारित झाल्यानंतर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

या मालिकेत तब्बल 73 कलाकारांनी काम केले होते. नवीन निश्चल, देवेन भोजानी, शेखर सुमन, फरीदा जलाल, भावना बलसावर, उर्वशी ढोलकिया, सुषमा सेठ, सतीश शाह, जतिन कनकिया, अनंत महादेवन यांसारख्या कलाकारांनी आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.

सर्व कलाकारांनी दिलेली मारूती कार भेट

मालिकेची कथा आनंद महेंद्रू यांनी आपल्या कुटुंबापासून प्रेरणा घेऊन तयार केली होती. त्यांच्या कुटुंबात मोठ्या संख्येने मुले असल्याने त्यांनी त्यांच्यावर आधारित पात्रांची रूपरेषा तयार केली. फरीदा जलाल यांच्या भूमिकेसाठी त्यांनी आपल्या आईकडून, तर शेखर सुमन यांच्या व्यक्तिरेखेसाठी आपल्या काकांकडून प्रेरणा घेतली होती.

मालिका सुपरहिट झाल्यानंतर आनंद महेंद्रू यांनी 52 व्या भागानंतर संपूर्ण कलाकारांना मारुती कार भेट म्हणून दिल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही, तर त्यांनी संपूर्ण टीमला स्वतःच्या खर्चाने लंडनची सहलही घडवून आणली होती.

शूटिंग दरम्यान कलाकारांना करावा लागला अडचणींचा सामना

मात्र या मालिकेच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना मोठ्या अडचणींचाही सामना करावा लागला. आर.के. स्टुडिओमध्ये शूटिंग होत असताना त्या काळात पंखे किंवा एसीची सुविधा नव्हती. मोठ्या लाईट्समुळे स्टुडिओमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होत असे. त्यामुळे काही कलाकारांना शूटिंगदरम्यान चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचेही सांगितले जाते.

आज या मालिकेतील अनेक कलाकार अभिनयापासून दूर आहेत, तर काहींचे निधन झाले आहे. नवीन निश्चल यांचे 2011 मध्ये, शम्मी यांचे 2018 मध्ये आणि जतिन कनकिया यांचे 1999 मध्ये निधन झाले. मालिकेतील लोकप्रिय कलाकार सतीश शाह यांचेही 2025 मध्ये निधन झाले. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील नाती, हास्यविनोद आणि घरातील रोजच्या गमती-जमती यामुळे ही मालिका आजही तितकीच आपलीशी वाटते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us