आठवडा झाला तरी हिरो-हिरोईन भेटेना, नुसता टाइमपास..; तेजश्री-सुबोधच्या मालिकेवर चिडले प्रेक्षक

'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. परंतु आठवडाभरातच प्रेक्षक या मालिकेच्या कथानकावर चिडले आहेत.

आठवडा झाला तरी हिरो-हिरोईन भेटेना, नुसता टाइमपास..; तेजश्री-सुबोधच्या मालिकेवर चिडले प्रेक्षक
तेजश्री प्रधान, सुबोध भावे
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 22, 2025 | 11:35 AM

‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलंय. नुकतीच ही मालिका सुरू झाली असून आठवडाभराच्या आतच प्रेक्षक त्याला वैतागले आहेत. या मालिकेत सध्या भावनांचा खेळ सुरू आहे. स्वानंदी आणि समर यांच्या नात्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आश्रमातील समस्या हाताळताना स्वानंदीने कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी तिने थेट वकीलांची मदत घेतली. तिच्या या निर्णयाला आश्रमातील अन्य सदस्यांनीही पाठिंबा दिला आणि सर्वांनी एकत्र येऊन भविष्याचे निर्णय एकमताने घेण्याचा निर्धार व्यक्त केला. दुसरीकडे, समरच्या घरी अधिराचं स्थळ पाहण्याचं ठरलंय. काकू समरला या कार्यक्रमासाठी वेळेत घरी पोहोचण्याची विनंती करते. समर निघतो पण रस्त्यात त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येतं.

सुष्मिता आणि तिच्या आईचा रस्त्यात अपघात होतो. दोघींची अवस्था चिंताजनक नसली तरी यामुळे समर घरी वेळेत पोहोचू शकत नाही. त्यामुळे कुटुंबीयांचा समरवरचा रोष वाढतो. त्याचवेळी स्वानंदीला रोहनचा फोन येतो. रोहनच्या प्रमोशनची बातमी घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते आणि स्वानंदी त्याचा यश साजरा करण्यासाठी घरातच एक छोटंसं सेलिब्रेशन आयोजित करते. आता समरचा संयम तुटलाय. घरातल्या घटनांवर आणि स्वतःवर होणाऱ्या दबावामुळे त्रस्त होऊन तो थेट कमिशनर साहेबांना कॉल करून स्वानंदीच्या घरातल्यांविरुद्ध तक्रार दाखल करतो. या धक्कादायक निर्णयाचा परिणाम फारच गंभीर आहे. सेलिब्रेशनच्या मधेच पोलीस घरात पोहोचतात आणि स्वानंदीच्या आई, सुष्मिताला चौकशीसाठी घेऊन जातात.

स्वानंदीसाठी हा कसोटीचा काळ सुरू आहे. आठवडाभरात या मालिकेत एकही घडामोड सकारात्मक घडली नाही, अशी तक्रार आता प्रेक्षक करत आहेत. या मालिकेच्या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘एक आठवडा झाला तरी नायक-नायिका भेटले नाहीत. नुसता टाइमपास सुरू आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘एकही सकारात्मक सीन झाला नाही, मालिकेच्या पहिल्या भागापासून फक्त नकारात्मकता पहायला मिळतेय’, असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘किती तो गैरसमज निर्माण केलाय. समर आणि स्वानंदी एकमेकांसमोर कधी येतील याची प्रतीक्षा करतोय’, अशा भावना प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

आता या मालिकेत समरला त्याच्या कृतीचा पच्याताप होईल का, हे कुटुंब पुन्हा एकत्र येईल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी भागात मिळतील, अशी अपेक्षा आहे. ‘वीण दोघातली ही तुटेना’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.