Vivek Oberoi : ती भीती, त्या वेदना..; ऐश्वर्या-सलमानच्या वादावर विवेक ओबेरॉयची स्पष्ट प्रतिक्रिया

Vivek Oberoi : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. ऐश्वर्यासोबत ब्रेकअपनंतर त्याची काय अवस्था झाली होती आणि त्यातून तो कसा सावरला, याविषयी त्याने सांगितलं.

Vivek Oberoi : ती भीती, त्या वेदना..; ऐश्वर्या-सलमानच्या वादावर विवेक ओबेरॉयची स्पष्ट प्रतिक्रिया
Salman Khan, Aiswarya Rai and Vivek Oberoi
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 30, 2025 | 9:30 AM

Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉयचं ऐश्वर्या रायसोबतचं अफेअर जगजाहीर होतं. या दोघांचं अफेअर जितकं चर्चेत होतं, त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्या ब्रेकअपची झाली होती. 2003 मध्ये विवेकने पत्रकार परिषद घेत अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केले होते. ऐश्वर्यासोबतच्या नात्यामुळे सलमानने धमकी दिल्याचा आरोप त्याने या पत्रकार परिषदेत केला होता. पुढे हा वाद इतका वाढला की त्याचा थेट परिणाम विवेकच्या करिअरवर झाला आणि बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक त्या संपूर्ण वादावर मोकळेपणे व्यक्त झाला. त्यावेळी समस्यांचा सामना कसा केला, करिअर सांभाळण्याचा प्रयत्न कसा केला आणि ब्रेकअपच्या दु:खातून स्वत:ला कसं सावरलं, याविषयी त्याने सांगितलं.

याविषयी विवेक म्हणाला, “मी अत्यंत संवेदनशील आणि भावूक व्यक्त आहे. आता हृदयभंग होईल, या भीतीत मी जगत नाही, कारण याआधी मी ते अनुभवलंय. मी असा काळ अनुभवला आहे, जेव्हा आयुष्य अत्यंत भयावह, एकाकी आणि घुसमटल्यासारखं वाटू लागतं. मी एक अशी व्यक्ती आहे, जी नातेसंबंधांवर खूप प्रेम करते, मानवतेला महत्त्व देते आणि कुटुंबाला प्राधान्य देते. माझ्या ब्रेकअपनंतर मी पूर्णपणे माघार घेतली होती. मी खूप एकटा पडलो होतो. मला पुन्हा ते दु:ख अनुभवायचं नव्हतं. माणून म्हणून आपण सर्वजण कधी ना कधी अशा परिस्थितीतून जातो. परंतु त्यावेळी मी माझ्या स्वभावाविरुद्ध जगत होतो. त्यातून बाहेत पडून तुम्हाला पुन्हा प्रेमात पडावं लागतं आणि पुन्हा सर्वकाही अनुभवावं लागतं.”

2003 मध्ये सलमान खानसोबत झालेल्या वादाबद्दल विवेक पुढे म्हणाला, “आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा आपण एखाद्या समस्येला सामोरं जात असतो, भांडणं होत असतात, वादविवाद होत असतात, तेव्हा ती समस्या आपल्याला खूप मोठी वाटते. परंतु आता जेव्हा मी माझ्या मुलांच्या समस्या पाहतो, तेव्हा मला हसू येतं. कारण त्यांच्या समस्या या समस्याच नसतात. अशाच प्रकारे जेव्हा देवसुद्धा तुमच्या समस्यांकडे पाहतो, तेव्हा ते असाच विचार करत असतील की, बाळा ही तर खूप छोटीशी गोष्ट आहे. मी तुला आणखी सशक्त बनवतो. हा दृष्टीकोन नंतर आपल्यासमोर येतो. या गोष्टीची जाणीव खूप उशिराने होते.”

“आता मला त्या काळातील कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणं खूप विचित्र वाटतं. भीती, कटुता, वेदना आणि जखमा.. हे सर्व त्यावेळी खूप जड वाटत होतं. पण आज मी असं म्हणू शकतो की, मी जे काही अनुभवलं ते मी मागे सोडून दिलं आहे आणि विसरलो आहे. या संपूर्ण प्रवासात सर्वांत कठीण गोष्ट म्हणजे तुमच्या आईच्या डोळ्यात अश्रू आणि तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता पाहणं. ते क्षण कायम तुमच्यासोबत राहतात. तुम्हाला त्या सर्व दु:खातून पुढे जावं लागतं आणि तुमच्या पालकांसोबतचे आनंदी क्षण लक्षात ठेवावे लागतात. कारण जर तुम्ही त्या नकारात्मक भावनांमध्ये अडकून राहिलात तर तुमची ऊर्जासुद्धा नकारात्मक होते”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.