
Dam on Kunar River : भारतानंतर आता अफगाणिस्तानने सुद्धा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या नदीवर धरण बांधण्याचा आणि पाणी वळवण्याचा निर्णय तालिबानने घेतला आहे. तालिबानचे उप माहिती मंत्री मुजाहित फाराही यांनी ही घोषणा केली. पाणी आणि ऊर्जा मंत्रालयाचे सर्वोच्च नेते शेख हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी कुनार नदीवर तातडीने धरण, बंधारे बांधण्याचे आणि पाणी अडवण्याचे काम सुरु करण्याचा आदेश दिला आहे. ही नदी पाकिस्तानकडे वाहते. या निर्णयामुळे पाकिस्तानमधील अनेक गावखेडी आणि शहरांचा पाणी पुरवठा आणि शेतीवर मोठा परिणाम होणार आहे.
तातडीने निर्णयाची अंमलबजावणी
मुजाहिद फाराही यांच्यानुसार, अमीर अल मुमिनीन यांनी त्यांच्या मंत्रालयाला कोणताही विलंब न करता कुनार नदीवर धरण, बंधारे बांधकामाचे आदेश दिले. त्यासाठी कोणत्याही परदेशी कंपनीची वाट पाहण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे स्थानिक अफगाणमधील कंपन्या हे काम लागलीच सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अफगाणिस्तानला त्यांच्या पाण्याच्या स्त्रोताबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे पाणी आणि ऊर्जा मंत्री मुल्ला अब्दुल लतीफ मंसूर यांनी म्हटले आहे. यामुळे पाकिस्तानवर अजून एक मोठे संकट आल्याचे म्हटले जाते.
स्थानिक अफगाणी कंपन्यांना काम
परदेशी कंपन्यांकडे हे काम दिल्यास त्यासाठी विलंब होईल. त्यामुळे आता तातडीने हे काम स्थानिक अफगाणी कंपन्यांकडे सोपविल्या जाणार आहे. त्यांना ताबडतोब हे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपमाहिती मंत्री मुजाहिद फाराही यांनी सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली. सर्वोच नेते शेख हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी कुनार नदीवर धरणासह बंधारा बांधण्याचे काम लागलीच सुरु करण्याचे आदेश दिल्याचे फाराही यांनी स्पष्ट केले. कामाला कोणताही उशीर नको म्हणून स्थानिक कंत्राटदार कंपनीला काम देऊन तातडीने हे काम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारताचा मोठा झटका
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या सिंधू नदी पाणी वाटप करार (Indus Water Treaty Suspended) रद्द केला. पाकिस्तानचा त्यामुळे जळफळाट झाला. मोदी सरकारने पश्चिम वाहिनी नद्यांचे (झेलम-चिनाब-सिंधू) पाणी सुद्धा अडवले. पाकिस्तानची जलकोंडी करण्यात आली. कोणत्याही प्रशासकीय अडचणी येऊ नये यासाठी सिंधू नदी खोऱ्यातील सर्वच नद्यांच्या पाण्याविषयीच्या योजनांना झटपट मंजूरी देण्यात आली आहे. तीन वर्षात सिंधू नदीचे पाणी कालव्याच्या माध्यमातून राजस्थानच्या श्रीगंगानगरपर्यंत आणण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 200 किलोमीटर लांब कालवा आणि 12 जोडणी कालवे तयार करण्यात येणार आहे. आता भारताचे हेच धोरण तालिबान राबवत आहे. यामुळे पाकिस्तानची चांगलीच जलकोंडी होणार आहे. पाकिस्तानला त्याचा मोठा फटका बसेल.