PNS Ghazi : 1971 च्या युद्धात भारताने बुडवलेली, आता पाकिस्तानी नौदलाला पुन्हा मिळाली पीएनएस गाजी पाणबुडी
PNS Ghazi : 1971 च्या युद्धात भारताने विशाखापट्टणमजवळ पाकिस्तानी पाणबुडी बुडवली. त्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर गेला. त्यांनी शरणागतीची घोषणा केली. आता 54 वर्षानंतर पाकिस्तानी नौदलाने पुन्हा एकदा पीएनएस गाजीचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे.

पाकिस्तानी नौदलाने 54 वर्षानंतर आपल्या ताफ्यात पीएनएस-गाजी नावाच्या पाणबुडीचा समावेश केला आहे. 1971 सालच्या युद्धात भारताने पाकिस्तानची पीएनएस गाजी पाणबुडी विशाखापट्टणमच्या बंदराजवळ बुडवली होती. पीएनएस गाजीला जलसमाधी मिळाल्यानंतर पाकिस्तानचा आत्मविश्वासच संपला. त्यानंतर त्यांनी शरणागतीची घोषणा केलेली. भारताने त्यांची पाणबुडी बुडवली हे पाकिस्तानने कधीच मान्य केलं नाही. जिओ टीव्हीनुसार पाकिस्तानने आता ज्या पाणबुडीच नाव गाजी ठेवलं आहे, ती चीनकडून विकत घेतली आहे. मागच्यावेळी अमेरिकेकडून ही गाजी पाणबुडी विकत घेतली होती. त्याचा ढिगारा आजही विशाखापट्टणमच्या बंदराजवळ आहे.
रिपोर्ट्नुसार, पाकिस्तानने ज्या पाणबुडीचं नाव गाजी ठेवलय , ती चिनी टाइप 039A /039B पाणबुडी आहे. ही पाणबुडी चीनने कराची बंदरामध्ये तयार केलीय. पाकिस्तान या पाणबुडीला मेड इन पाकिस्तान ठरवत आहे. 2015 साली पाकिस्तानने चीनसोबत या पाणबुडी खरेदीचा करार केला होता. 2026 साली पाकिस्तानला ही पाणबुडी सोपवली जाईल. नेवल टुडेनुसार पीएनएस गाजी ही जी नवीन पाणबुडी आहे, तिचं वजन 2800 टनच्या आसपास आहे. त्याची लांबी 77 मीटर आहे. या पाणबुडीवर चालक दलाचे 35 ते 40 जण राहू शकतात.
या पाणबुडीच वैशिष्ट्य काय?
20 नॉट्स हा या पाणबुडी समुद्रातील वेग आहे. पीएनएस गाजीवर सबसर्फेस लॉन्च क्रूज़ मिसाइल तैनात करता येऊ शकतात. या पाणबुडीच वैशिष्ट्य म्हणजे ही पाणबुडी समुद्रात हालचाल करताना कळत नाही. म्हणजे समुद्रात ऑपरेशनसाठी निघेल, तेव्हा कोणाला या बद्दल समजणार नाही.
बंगालच्या खाडीत येण्याआधी गाजी पाणबुडी कुठे गेलेली?
बांग्लादेश मुक्ती संग्रामाच्यावेळी जेव्हा आयएनएस विक्रांतकडून पाकिस्तानातील सैन्य तळावर हल्ले सुरु होते, तेव्हा विक्रांतला बुडवण्यासाठी पाकिस्तानने पीएनएस गाजी पाणबुडी बंगालच्या खाडीमध्ये पाठवली होती. बंगालच्या खाडीत येण्याआधी या पाणबुडीला श्रीलंकेत नेण्यात आलं. त्यावेळी आयएनएस विक्रांत विशाखापट्टणमध्ये असल्याची बातमी पसरली होती.
अशी बुडवली पाकिस्तानी पाणबुडी पीएनएस गाजी
खरंतर त्यावेळी विक्रांत विशाखापट्टणममध्ये नव्हती. भारतीय सैन्य संस्थांनी पाकिस्तानची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक ही बातमी पसरवली होती. पाकिस्तानला ही बातमी मिळताच पीएनएस गाजीला विशाखापट्टणमच्या दिशेने पाठवण्यात आलं. विशाखापट्टणमला पोहोचण्याआधीच गाजीच्या आत इंधन गळती सुरु झाली. चालक पथकाला प्रयत्न करुनही इंधन गळती रोखता आली नाही. इथे विशाखापट्टणम बंदरात उभ्या असलेल्या आयएनएस राजपूतने सुमद्रात हल्ला केला. त्यानंतर काही वेळाने विशाखापट्टणम बंदराजवळ मोठा स्फोट झाला. गाजी पाणबुडीचा हा स्फोट होता. त्यानंतर पीएनएस गाजी ढिगाऱ्यामध्ये बदलून गेली.
