आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली..; मराठमोळ्या अभिनेत्रीने फोडला टाहो
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेच्या आईचं निधन झालं आहे. भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिची आई आजारी होती.

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’, ‘रमा राघव’, ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भाग्यश्रीच्या आईचं निधन झालं असून सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली आहे. दोन महिन्यांपूर्वीच भाग्यश्रीचं लग्न झालं होतं. त्यावेळीही तिची आई आजारी होती. आजारपणामुळेच त्यांनी मुलीचं लग्न लावून दिलं. पण आता लाडक्या लेकीचा संसार बघण्यासाठी त्या जगात नसल्याचं दु:ख भाग्यश्रीने व्यक्त केलं आहे. लग्नातला आईसोबतचाच फोटो शेअर करत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
भाग्यश्री न्हाळवेची पोस्ट-
‘आई.. आज माझ्या लग्नाला फक्त दोन महिने पूर्ण होत आहेत, पण दोन महिन्यात आईने मला एकही फोन केला नाही. का तर “सासरी गेलेल्या मुलीला आईने सारखा फोन करू नये. तिचं संसारात लक्ष लागत नाही.” अशा मताची माझी आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली आणि आता माझ्या आईचा कधीच फोन येणार नाही. लग्नाला माझ्या दोन महिने पण झाले नाहीत, पण तू मला सोडून गेलीस. हे मला मान्य होत नाहीये. मला शेवटपर्यंत तुझ्यापाशी राहायचं होतं म्हणून मला लग्न नव्हतं करायचं. पण तू “माझी शेवटची इच्छा आहे राणा, तू माझ्यासाठी लग्न कर आणि मागे वळून बघू नकोस. माझं काय पण होईल, पण तू मागे वळून यायचं नाहीस. मुलगी म्हणून तू खूप जास्त केलं आहेस. तू आता तुझा विचार कर माझ्यासाठी” खूप ठाम तिचा निर्णय. एका भेटीत मला तिने मला लग्नाचा निर्णय द्यायला भाग पाडलं. मी काय करतेय हे मला तेव्हा लक्षात आलं नाही. फक्त आई सांगतेय आणि आईची इच्छा म्हणून या लग्नाला उभी राहिले. पण आई आज तू गेल्यावर मला कळलं आहे तू माझ्यासाठी निवडलेला मुलगा आणि घर खरंच माझ्यासाठी किती बरोबर आहे,’ अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘तुझ्यासाठी मी लग्न केलं, पण तू फक्त माझं लग्न पाहिलंस, माझा संसार पहायला तू मला आयुष्यभर हवी होतीस. माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करेल सांग? दर पौर्णिमेला मी त्या सत्यनारायणाला दिवा लावायचे आणि तुझ्यासाठी प्रार्थना करायचे. पण कालच्या पौर्णिमेला मी तुझ्या नारायणासोबत तुझ्या चितेला नमस्कार करत होते. मला तू अशी सोडून जायला नको होतीस. तुला सगळं उपजत होतं आई. म्हणून तू माझी सोय करून गेलीस. आईला लेकराच चांगलंच कळत हे खरंच. पण तरीही आई तू मला हवी होतीस. आता मला कोण राणा म्हणेल? मला संसारात पाडलंस आणि तू मात्र निघून गेलीस. तू सांगितल्याप्रमाणे आई मी मागे वळून बघणार नाही हे तुला माझं वचन आहे.’
भाग्यश्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. आई किंवा बाबांचं निघून जाणं, यापेक्षा आयुष्यात कोणतं मोठ दु:ख नाही, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
