Eknath Shinde : ‘मग, तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी..’ सिद्धिविनायक मंदिर भ्रष्टाचार आरोपांवर एकनाथ शिंदेंचा मनसेला सवाल
Eknath Shinde : "जनेतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा. हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्यांना कळलं आहे जो राम का नाही वो किसी काम का नही" अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली.

नुकतीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची विधान भवनात भेट झाली. त्यावर तसचं उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर आणि सिद्धिविनायक मंदिर भ्रष्टाचार प्रकरणावर एकनाथ शिंदे बोलले आहेत.”आमचं महायुती सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहिल आहे. शेतकरी जेव्हा-जेव्हा अडचणीत आला, तेव्हा-तेव्हा त्याच्या मागे उभ राहण्याचं काम आम्ही केलय. आम्ही नेहमी सांगतो, राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. काल अंतिम आठवडा प्रस्तावात मुख्यमंत्री महोदयानी ज्या कर्जमाफीतल्या अटी होत्या, त्या अटी काढून टाकल्या. 50 हजाराच्या वरची अट काढून टाकली. लाखो शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतच कर्ज माफ होणार आहे. हा बळीराजाला मोठा दिलासा आहे” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
शरद पवारसाहेबांनी कर्जमाफीचं कौतुक केलं. त्यावर “शरद पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत. चांगल्याला चांगलं म्हणण्यांची त्यांची वृत्ती आहे. अनेकवेळा त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. काही लोक जे आहेत, सरकारने कितीही चांगलं काम केलं तरी सुद्धा सरकारवर आरोप, टीका करतात. खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारची वृत्ती विरोधी पक्षातल्या लोकांची आहे. त्यांना खऱ्या अर्थाने पवारांनी दिलेलं उत्तर आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
जो राम का नाही वो किसी काम का नही
उद्धव ठाकरे नागपूरमध्ये येऊन रामरक्षा आंदोलन करणार आहेत. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सूचक शब्दात टीका केली. “जनेतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा. हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्यांना कळलं आहे जो राम का नाही वो किसी काम का नही. हिंदुत्व हे काही आपण टि-शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही. ते मनातून असावं लागतं. अयोध्या मंदिरावर टीका करणाऱ्यांनी आता रामरक्षा म्हणणं हा एक मोठा विनोद आहे. ज्यांनी हनुमान चालीसा म्हटली, त्यांना जेलमध्ये टाकलं” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल
सिद्धिविनायक मंदिरातील भ्रष्टाचारांच्या आरोपांवर एकनाथ शिंदे म्हणाले की, “मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याला मी उत्तर दिलं आहे. सिद्धिविनायक मंदिरात गडबड झाली, तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी चौकशीचे आदेश का दिले नाहीत?” “अयोध्या मंदिरात दान चोरी प्रकरणात जे झालय, जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. त्यांना तुरुंगात टाकलं जाईल हा विश्वास आहे” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदेंवर लोकांचा विश्वास
शिवसेनेत बाहेरुन येणार्यांना आमदारकीसाठी किंवा अन्य पदांसाठी संधी दिली जातेय, त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “पक्ष पुढे जात असताना जी काही समीकरणं आहेत, पक्षवाढीसाठी करावी लागतात. पक्ष वाढला तर सर्व कार्यकर्त्यांना संधी देता येते. शिवसेना हा कमिटमेंट देणारा पक्ष आहे. एकनाथ शिंदेंवर लोकांचा विश्वास आहे”
