होर्मुझच्या खाडीत महाकाय जहाजावर हल्ला, अचानक हल्ला झाल्याने खळबळ; भारताचं कनेक्शन समोर!
Attack on Ship : होर्मुझच्या खाडीतील अनेक जहाजांवर हल्ले होत आहेत. अशातच आता भारताकडे येणाऱ्या एका जहाजावर भीषण हल्ला झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मध्य-पूर्वेत युद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. होर्मुझच्या खाडीतील अनेक जहाजांवर हल्ले होत आहेत. अशातच आता थायलंडचे मयूरी नारी हे मालवाहू जहाज होर्मुझच्या सामुद्रधुणीतून भारताकडे येत असताना त्याच्यावर भीषण हल्ला झाला आहे. या जहाजावर एकूण 23 जण होते. हल्ल्यानंतर रॉयल थाय नेव्हीने तातडीने मदत पोहोचवून 20 खलाशांना सुरक्षित बाहेर काढले, तर तीन जण अजूनही जहाजावर असल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यानंतर जहाजातून काळा धूर उठताना दिसला आणि लाइफबोट्स समुद्रात तरंगताना दिसल्या. या हल्ल्याचे कारण शोधले जात आहे अशी माहिती थायलंडच्या नौदलाने दिली आहे. कारण या जहाजावरील हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
मयूरी नारी हे एक महाकाय मालवाहू जहाज आहे, ते थायलंडची कंपनी प्रेशियस शिपींग पीसीएलच्या मालकीचे आहे. या हल्ल्याच्या वेळी जहाज ओमानजवळील समुद्रात होते. रॉयल थाई नेव्हीने दिलेल्या माहितीनुसार हे जहाज काही काळापूर्वी युएईतील बंदरातून निघाले होते. या घटनेनंतर थायलंडच्या नौदलाने आंतरराष्ट्रीय मदतीद्वारे बचावकार्य सुरू केले आहे. थाई अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव आणि सुरक्षेचे सर्व उपाय तातडीने सुरू करण्यात आले आहेत.
आणखी दोन जहाजांवर हल्ले
आज हार्मुनच्या खाडीत आणखी दोन जहाजांवर हल्ले झाले असल्याती माहिती समोर आली आहे. इराणने होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजांवर हल्ल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे इराणकडून या जहाजांवर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या हा परिसर धोकादायक आणि असुरक्षित बनला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या मालवाहतुकीवर परिणाम झाला आहे.
हॉर्मुज सामुद्रधुनी का महत्त्वाची आहे?
हॉर्मुज सामुद्रधुनी हा अरुंद समुद्री मार्ग पर्शियन गल्फला अरबी समुद्राशी जोडतो. हा जलमार्ग जगातील तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जगातील सुमारे 20% तेल आणि नैसर्गिक वायू याच मार्गाने वाहतूक होते. सौदी अरेबिया, युएई, कुवेत आणि इराक हे देश आपले तेल याच मार्गाने निर्यात करत असतात. मात्र आता जहाजांची वाहतूक थांबल्यामुळे तेलाचा पुरवठा प्रभावित झाला आहे. अनेक देशांमध्ये इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता आहे.
