Brics Summit : आधी ताटकळत ठेवलं, आता अखेरच्या क्षणी चिनी राष्ट्रपती जिनपिंग यांनी भारत दौऱ्याबद्दल घेतला निर्णय
Brics Summit : यंदाची ब्रिक्स शिखर परिषद भारतात होणार आहे. या परिषदेसाठी अनेक देशांचे प्रमुख भारतात येतील. यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिनही आहेत. पण चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अखेरच्या क्षणापर्यंत निर्णय घेतला नव्हता.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याबद्दल अखेर निर्णय झाला आहे. आज सकाळपर्यंत जिनपिंग ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार की नाही, या बद्दल स्पष्टत नव्हती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या संदर्भात माहिती दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं निमंत्रण स्वीकारुन शी जिनपिंग 12 ते 13 सप्टेंबरपर्यंत भारतात होणाऱ्या 18 व्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होतील. शी जिनपिंग यांचा हा सातवर्षानंतर भारत दौरा आहे. भारत आणि चीनमध्ये मागच्या काही महिन्यापासून संबंध सुधारत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांचा भारत दौरा महत्वाचा मानला जात आहे. 2020 मध्ये झालेल्या गलवान संघर्षानंतर दोन्ही नेत्यांमध्ये होणारी ही पहिली द्विपक्षीय चर्चा आहे.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्रपती जिनपिंग अलीकडेच किर्गिस्तान बिश्केक येथे शंघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत एकाच मंचावर एकत्र आले होते. तिथे दोघांनी परस्परांशी हस्तांदोलन जरुर केलं. पण कुठलीही द्विपक्षीय चर्चा केली नव्हती. नवी दिल्लीत 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान ब्रिक्स शिखर सम्मेलन होणार आहे. या सम्मेलनासाठी ब्रिक्स देशाचे प्रमुख येणार आहेत. आतापर्यंत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन, इराणचे राष्ट्रपती पेजेश्कियान आणि शी जिनपिंग यांनी सहभागी होणार असं म्हटलं आहे.
2019 साली ते अखेरचे आले होते
शी जिनपिंग यांचा सात वर्षातला हा पहिला भारत दौरा असेल. याआधी 2019 साली ते अखेरचे आले होते. त्यावेळी तामिळनाडूच्या मामल्लपूरम येथे दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक शिखर परिषद झाली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत-चीन संबंध आणि द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित अनेक मुद्यांवर चर्चा केली होती. जिनपिंग याआधी 2016 साली गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. सप्टेंबर 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भारत दौरा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांनी व्यापक चर्चा केलेली.
संबंध हळूहळू सामान्य करण्याचे प्रयत्न
भारत-चीन संबंध दीर्घकाळ तणावाखाली होते. आता हे संबंध हळूहळू सामान्य करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सीमावादामुळे दोन्ही देशांच्या संबंधात बरेच चढ-उतार आले. अशावेळी दोन्ही देशांच्या नेतृत्वामध्ये चर्चा होत असल्याने संबंधात प्रगती होऊ शकते.
