स्वागतासाठी 50 लाख लोकांचा ताफा, बांगलादेशचे भावी पंतप्रधान 17 वर्षांनी परतणार? नेमकं काय घडतंय?
बांगलादेशात सध्या घडामोडी वाढल्या आहेत. येथे तब्बल 17 वर्षांनी माजी पंतप्रधान यांचा मुलगा बांगलादेशात परतणार आहे. रहमान यांच्या स्वागतासाठी जोमात तयारी केली जात आहे.

Tariq Rahman : सध्या बांगलादेशात तणावाची स्थिती आहे. इथे पुन्हा एकदा मोठा हिंसाचार उफाळला आहे. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमध्ये सगळीकडे हाहाकार माजला आहे. असे असतानाच या ठिकाणी आगामी वर्षात फेब्रुवारी महिन्यात सर्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीनंतर बांगलादेशला नवा पंतप्रधान मिळणार आहे. असे असतानाच आता बांगलादेशच्या माजी पंतप्रधान तथा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) या पक्षाच्या कार्यवाहक अध्यक्षा खालिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान तब्बल 17 वर्षांनी बांगलादेशात परतणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तिथे सध्या जोमात तयारी केली जात आहे. या स्वागत सोहळ्यास तब्बल 50 लाख लोकांना गोळा करण्याचे काम बीएनपी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते बीएनपी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता बांगलादेशात सगळी राजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.
17 वर्षांनी रहमान बांगलादेशात परतणार
मिळालेल्या माहितीनुसार तारिक रहमान गेल्या 17 वर्षांनंतर पहिल्यांदाच बांगलादेशात परतत आहेत. ते सध्या लंडनमध्ये राहतात. पीएनबी पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे जोमात तयारीला लागले आहेत. तारिक रहमान हे 60 वर्षांचे आहेत. खालिदा जिया यांची प्रकृती सध्या खालावलेली आहे. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे बीएनपी या पक्षाचे नेतृत्त्व करण्यासाठी एक खंदे नेतृत्त्व म्हणून रहमान यांच्याकडे पाहिले जात आहेत. विशेष म्हणजे तेच बीएनपी या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
बीएनपी पक्षाचा दबदबा वाढला
बांगलादेशातील स्थानिक राजकीय तज्ज्ञांनुसार यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपी हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रहमान हे लंडनहून परतत आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात विद्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनानतर तत्कालीन पंतप्रधन शेख हसीना यांचे सरकार कोसळले. तेव्हापासून बीएनपी या पक्षाचा बांगलादेशात दबदबा वाढला आहे. अशा स्थितीत आता रहमान यांची बांगलादेशात एन्ट्री होत आहे.
दरम्यान, आता रहमान यांच्या बांगलादेशात येण्याने तेथील राजकारण बदलण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांच्या पक्षाला तेथे निवडणूक लढवण्यावर यावेळी बंदी आहे. त्यामुळे बांगलादेशात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
