इराण-इस्त्रायल युद्धात भारताचा तडकाफडकी मोठा आदेश, भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी!
एकीकडे इराणची अमेरिकेसोबत शांततेसाठी चर्चा सुरू असतानाच इराणने रविवारी रात्री उशिरा इस्त्रायलवर हल्ला केला. इस्त्रायलकडून लेबॉननवर हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हा हल्ला केला होता.

Iran Israel War : युद्ध संपवण्यासाठी इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. परंतु या चर्चेतून काहीही ठोस असं समोर आलेलं नाही. उलट दोन्ही देश एकमेकांच्या भूमिकांवर ठाम असल्याने कोणत्याही क्षणी युद्ध पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त केली जात होती. आता हीच भीती खरी ठरली आहे. इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी एकमेकांवर मोठे हल्ले केले आहेत. हे हल्ले एवढे भीषण आहेत की, पुन्हा एकदा युद्ध सुरू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नव्याने सुरू झालेल्या या हल्ल्यानंतर आता भारतानेही सावध पवित्रा घेतला आहे.
भारताने नेमकं काय केलं?
मिळालेल्या माहितीनुसार इस्त्रायल आणि इराण यांच्यातील नवा संघर्ष लक्षात घेऊन भारताने आपल्या नागरिकांसाठी काही सूचना केल्या आहेत. इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी काळजी घ्यावी. सतर्क राहावे, असे भारतीय प्रशासनाने आवाहन केले आहे. तसेच भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इराणमधून बाहेर पडावे, असेही भारताने सूचवले आहे. भारतीय नागरिकांनी सध्या इराणची यात्रादेखील करू नये, इराणला जाणे टाळावे, असा सल्ला भारतीय प्रशासनाने दिला आहे.
भारतीय दूतावासाने नेमकं काय सांगितलं?
तेहरान येथील भारतीय दूतावासाने या सूचना जारी केल्या आहेत. “सध्याची इराणमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता आम्ही भारतीयांनी इराणमध्ये जाण्याचे टाळावे, असा सल्ला देत आहोत. सध्या जे भारतीय नागरिक इराणमध्ये आहेत, त्यांनीदेखील लवकरत लवकर कोणत्याही मार्गाने इराण देश सोडावे,” असेदेखील इराणमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाने आपल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.
इराण-इस्त्रायलमध्ये संघर्ष का पेटला?
दरम्यान, एकीकडे इराणची अमेरिकेसोबत शांततेसाठी चर्चा सुरू असतानाच इराणने रविवारी रात्री उशिरा इस्त्रायलवर हल्ला केला. इस्त्रायलकडून लेबॉननवर हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हा हल्ला केला होता. इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलनेदेखील इराणवर प्रत्युत्तरादाखल मोटे हल्ले केले. इस्फहान, करज, तबरीज, तेहरान या भागात हल्ले झाल्याचे सांगितले जात आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने तेहरान येथील इमाम खुमैनी अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.