फक्त एक-दोन की, भारताच्या सगळ्याच जहाजांना हॉर्मुझ पार करण्याची परवानगी? इराणच्या राजदूतांनी खरं काय ते सांगितलं

मध्य पूर्वेतील युद्धामुळे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केलं आहे. त्यामुळे भारतासह अन्य देशांची जहाजं तिथे अडकून पडली आहे. इराणने भारताच्या काही जहाजांना हॉर्मुझ पार करण्याची परवानगी दिली. पण सरसकट सगळ्याच जहाजांना परवानगी आहे का? इराणच्या राजदूतांनी नेमकं सत्य सांगितलं.

फक्त एक-दोन की, भारताच्या सगळ्याच जहाजांना हॉर्मुझ पार करण्याची परवानगी? इराणच्या राजदूतांनी खरं काय ते सांगितलं
strait of hormuz
| Updated on: Mar 14, 2026 | 11:03 PM

पश्चिम आशियात सुरु असलेल्या संघर्षा दरम्यान काही भारतीय जहाजांना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे, असं इराणचे भारतातील राजदूत Mohammad Fathali यांनी शनिवारी सांगितलं. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून असलेले मैत्रीसंबंध आणि संयुक्त हित डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले. इंडिया टुडे कॉन्क्लेव 2026 मध्ये Mohammad Fathali बोलत होते. सुरुवातीला भारतासोबत संवाद स्थापन करताना काही अडचणी आलेल्या. पण आता दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतायत असं ते म्हणाले.

“आम्ही काही जहाजांना हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे. पण किती जहाजांना परवानगी दिलीय ते आता सांगू शकत नाही. या मुद्यावर पुढे माहिती दिली जाईल. इराण आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि संयुक्त हित आहे” असं Mohammad Fathali यांनी सांगितलं. शुक्रवारी इराणने भारतीय झेंडा असलेल्या दोन LPG जहाजांना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पार करण्याची परवानगी दिलेली. अमेरिका आणि इस्रायलने मिळून 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ला केला. त्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील जल वाहतूक बाधित झाली आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला.

या जलमार्गावर इराणचं नियंत्रण

स्ट्रेट ऑफ होर्मुज जगातील एका महत्वाच्या समुद्री मार्गापैकी एक आहे. या जलमार्गावर इराणचं नियंत्रण आहे. जागतिक तेल पुरवठ्याची जवळपास 20 टक्के तेल वाहतूक या मार्गावरुन होते. हा मार्ग बंद झाल्यामुळे भारताची समस्या वाढली आहे. भारताच्या एकूण कच्चा तेलाच्या जवळपास 40 टक्के आणि LNG चा 50 टक्केपेक्षा अधिक आणि जवळपास 90 टक्के एलपीजी याच मार्गावरुन येतो. सध्या भारतात तेलापेक्षा एलएनजीचं संकट अधिक गंभीर बनलं आहे. कारण भारताकडे जवळपास दोन महिने पुरेल इतका तेल साठा आहे.

“भारत-इराण संबंध भक्कम करण्यावर त्यांनी भर दिला. दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झाले, तर शत्रू त्याचा फायदा उचलेलं. दोन्ही देश इतके परिपक्व आहेत की, ते राजकीय आणि सामाजिक मुद्दे संभाळू शकतात” असं कॉन्क्लेव मध्ये Mohammad Fathali म्हणाले.

Follow Us