
मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक राजकारण बदलून गेलय. अमेरिका-इस्रायलने इराणवर हे युद्ध लादलं अशीच जगातील अनेक देशांची भावना आहे. त्यामुळे सध्या तरी अमेरिका-इस्रायल एकटे पडल्याचं चित्र आहे. नाटो सारख्या भरवशाच्या मित्राने देखील अमेरिकेला दगा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र देशांना आवाहन करुनही कोणी युद्धनौका पाठवायला तयार नाहीय. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करुन ठेवलय. तिथून होणारी जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प आहे. ट्रम्प यांनी आवाहन करुनही एकही देश स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये आपली युद्धनौका पाठवायला तयार नाही. ज्या अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदी करु नका असं सांगितलं होतं. आता त्याच अमेरिकेवर भारताला रशियाकडून तेल खरेदी करा असं सांगण्याची वेळ आली आहे. दोन आठवड्याच्या यु्द्धाने कसं चित्र बदललं त्याचं हे उत्तम उदहारण आहे.
भारत अमेरिकेशी व्यापार करार करण्याआधी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत होता. त्यावेळी रशिया भारताला भरपूर स्वस्तात तेल विकत होता. कारण त्यांना त्यातून पैसे मिळत होते. आता अमेरिकेच्या सांगण्यानंतर भारताने पुन्हा रशियाकडून तेल खरेदी सुरु केली, पण आता रशिया आपल्यासह इतर देशांना बाजार भावाने तेल विकतोय. त्यामुळे रशियावर टीका सुरु आहे. रशिया संधीसाधू आहे. रशिया भारतासोबतची मैत्री विसरला असं बोलल जातय. पण रशियाच्या बाबतीत अशी भूमिका बनवणं कितपत योग्य आहे?.
आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याला चुकीच नाही ठरवता येणार
मूळात आंतरराष्ट्रीय संबंधात मैत्रीचा मुख्य आधार व्यापार असतो. संरक्षण हा भारत आणि रशियाच्या व्यापारी संबंधांचा मुख्य आधार आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी करतो. रशियाच्या कठीण काळात आपण त्यांचं तेल विकत घेऊन अमेरिकेशी शत्रुत्व घेतलं, त्यांच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला. त्यामुळे रशियाने आताही वेळेचा विचार करुन इतक्या चढ्या दराने तेल विकायला नको होतं अशी एक भावना आहे. पण रशियाने आपल्याला स्वस्तात द्यावं असं वाटत असेल तर अमेरिकेशी करार झाल्यानंतर आपण त्यांच्याकडून आधी जितकी तेल खरेदी करत होतो ती कमी का केली?. उद्या युद्ध थांबल्यावर अमेरिका आपल्याला रशियाकडून तेल खरेदी करा असं सांगणार आहे का? याचं उत्तर नाही येतं. त्यामुळे परिस्थितीनुसार रशियाने आपल्या हिताला प्राधान्य दिलं. आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याला चुकीच नाही ठरवता येणार.
उलट भविष्यात संबंध अजून दृढ होतील
भारताने 2019 मध्ये जेव्हा जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद 370 रद्द केलं, तेव्हा भारताला पाठिंबा देणारा, भारताचा निर्णय योग्य आहे म्हणणारा पहिला देश रशिया होता. आज रशियाने आपल्याला S-400 सारखी अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम दिली. त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत. भविष्यात अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी आपल्याला रशियाची गरज लागेल. त्यामुळे तेलाच्या या किंमतीवरुन भारत-रशिया संबंध बिघडणार नाहीत. उलट भविष्यात ते अजून दृढ होतील.